नवी दिल्ली – पान्गोंग लेकच्या दक्षिण खोऱ्याजवळ चीनकडून नव्याने जैसे थे स्थिती बदलण्याचा प्रयत्न झाल्याच्या पार्श्वभूमीवर सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी लष्कर प्रमुख जनरल मनोज नरवणे दोन दिवस लडाखच्या दौऱ्यावर आज रवाना झाले.
या परिसरातील बदलत्या परिस्थितीचा वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांबरोबर लष्कर प्रमुख आढावा घेतील. तसेच या भागात तैनात असलेल्या लष्करी तुकड्यांबाबतही माहिती घेतील आणि आपत्कालिन परिस्थितीमध्ये देशाची मारक सिद्धताही तपासून पाहतील, असेही अधिकृत सूत्रांनी सांगितले.
चीनने पांन्गोंग तलावाच्या दक्षिणेकडच्या काही भाग ताब्यात घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केल्यावर पान्गोंग तलाव क्षेत्रात तणाव वाढला आहे. त्यामुळे या भागातील लष्करी कुमक आणि शस्त्रास्त्रांची उपलब्धताही भारताने तातडीने वाढवली आहे.
29 आणि 30 ऑगस्ट दरम्यानच्या रात्री फसलेल्या प्रयत्नानंतर दोन्ही बाजूंकडून परिस्थितीतील तणाव निवळण्यासाठी चर्चा सुरू असताना चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीने पुन्ह एकदा चिथावणीखोर हालचाली केल्याचे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते अनुराग श्रीवास्तव यांनी मंगळवारी सांगितले होते. त्यामुळे भारतीय लष्कराने या भागातील संरक्षणदृष्ट्या तीन प्रमुख ठिकाणचा बंदोबस्त वाढवला आहे.
पान्गोंग तलावाच्या उत्तरेकडील भागात प्रत्यक्ष ताबा रेषेजवळ भारतीय हद्दीमध्ये सैन्याच्या तैनातीबाबतच्या खबरदारीची उपाय योजना म्हणून काही फेरयोजनाही केल्या जात आहेत, असेही सूत्रांनी सांगितले.