2024 च्या लोकसभा निवडणुकांत भारतीय जनता पक्ष 100 टक्के यशस्वी होणार आहे; परंतु तरीही कार्यकर्त्यांनी बेसावध राहू नये, असा सावधगिरीचा इशारा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप स्थापनादिनाच्या निमित्ताने दिला. निवडणुकीला केवळ एक वर्ष राहिले असताना, विरोधी ऐक्याच्या दिशेने हालचाली सुरू झाल्या असून, इतके दिवस हे सारे पक्ष काय झोपले होते का, असा प्रश्न कोणाच्याही मनामध्ये येऊ शकतो.
महाराष्ट्रात महाविकास आघाडीतील कॉंग्रेससारखे पक्ष गेल्या वर्षापर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या व अन्य निवडणुका स्वबळावर लढण्याच्या वल्गना करत होते. सत्तेतून बाहेर व्हावे लागल्यानंतर स्वबळाच्या बाता मागे पडल्या आणि पदवीधर मतदारसंघाच्या व कसब्यासारख्या पोटनिवडणुकांत एकत्रपणे निवडणूक लढवल्याचा फायदा होऊ शकतो, हे महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या लक्षात आले. तरीदेखील सावरकर, ईव्हीएम, मोदी यांची पदवी यासारख्या मुद्द्यांवरून मविआतील मतभेद स्पष्ट झाले. गौतम अदानी यांच्या कथित घोटाळ्याची चौकशी जेपीसीमार्फत होण्याऐवजी, सर्वोच्च न्यायालयामार्फत होणे पुरेसे आहे, असे मत राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केल्यामुळे, राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस यांच्यात अंतर निर्माण झाले; परंतु तरीही कॉंग्रेसने त्याबद्दल तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली नाही. मात्र, महाराष्ट्रात या संदर्भात टीका होऊ लागताच, पवारांनी आपली भूमिका बदलण्याची तत्परता दाखवली.
काही मुद्द्यांवर वेगळी मते असली, तरी मविआतील पक्षांनी एकत्र राहावे आणि एकदिलाने काम करावे, असे मत पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर व्यक्त केले. एवढेच नव्हे, तर आपण कोणत्याही परिस्थितीत देशपातळीवर भाजपविरोधात कॉंग्रेसच्याच बाजूने राहणार असल्याचे त्यांनी सूचित केले. या सर्व पार्श्वभूमीवर, नवी दिल्लीत बिहारचे मुख्यमंत्री आणि जनता दल युनायटेड, म्हणजेच जदयूचे अध्यक्ष नितीशकुमार यांनी भाजपविरोधी एकजुटीसाठी हालचाली सुरू केल्या. त्यांनी कॉंग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. खर्गे यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत एकजुटीवर मतैक्य झाले आहे. विरोधी पक्षांनी एकत्र येऊन आगामी निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतल्याचे खर्गे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
या भेटीनंतर शरद पवार, खर्गे आणि राहुल गांधी यांचीही बैठक झाली. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनकाळात खर्गे यांनी विरोधी पक्षनेत्यांची बैठक घेतली होती. या अधिवेशनात सुरुवातीला तृणमूल कॉंग्रेस, भारत राष्ट्र समिती (बीआरएस) या पक्षांनी वेगळा सूर लावला होता; परंतु नंतरच्या टप्प्यात सर्व पक्षांनी मिळून मोदी सरकारविरोधात भूमिका घेतली होती. खर्गे यांनी त्यानंतर द्रमुकचे प्रमुख एम. के. स्टॅलिन तसेच उद्धव ठाकरे आदींशी फोनवरून संपर्क साधला होता. नितीशकुमार यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही भेट घेऊन, त्यांना भाजपविरोधी आघाडीत सहभागी होण्याचे आवाहन केले. नवी दिल्ली, पंजाब तसेच गुजरातमध्ये कॉंग्रेस आणि आप हे एकमेकांच्या विरुद्ध उभे ठाकले असले, तरीदेखील केजरीवाल यांनी कॉंग्रेसबरोबर भाजपविरोधी छावणीत जाण्याचे मान्य केले आहे,
हे विशेष. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत सामील होण्यास नकार दिला होता. परंतु त्यांच्याशीही नितीशकुमार चर्चा करत असून, बिहारचे उपमुख्यमंत्री आणि राजद नेते तेजस्वी यादव यांनीही यापूर्वीच अखिलेश यांची भेट घेतली आहे. तेजस्वी हे नितीशकुमार यांच्या समवेत दिल्लीत होते. तेदेखील भाजपचा पराभव करण्यासाठी सर्वंकष लढाई करण्याच्या आवश्यकतेवर भर देत आहेत. अर्थात या लढाईत अडचणी आहेत. कारण तृणमूल कॉंग्रेस व समाजवादी पक्षाने आघाडी न करता स्वतंत्रपणे आगामी लोकसभा निवडणुका लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. बिजू जनता दल, वायएसआर कॉंग्रेस व बीआरएस या पक्षांची आघाडीत दाखल होण्याची मानसिकता नाही. तेलुगू देसम तटस्थ असून, मायावती मात्र सातत्याने भाजपबाबत मवाळ भूमिकाच घेत आहेत. भाजपविरुद्ध प्रत्येक राज्यात एकास एक उमेदवार उभा केला पाहिजे, हा नितीशकुमार यांचा फॉर्म्युला असून, ममता व अखिलेश यांनी आपापले हट्ट सोडल्यास, ऐक्यास मदत होऊ शकते; परंतु ईडीच्या भीतीमुळे ममता, अखिलेश, मायावती आणि चंद्रशेखर राव हे आयत्यावेळी काय करतील, याची शक्यता नाही.
एम. के. स्टॅलिन यांचा द्रमुक कॉंग्रेससमवेत भक्कमपणे उभा असून, भाजपच्या धर्मवादास मागास जातीची मोट बांधून उत्तर द्यावे, अशे स्टॅलिन यांचे प्रयत्न आहेत. नितीशकुमार यांनी बिहारमध्ये ओबीसींची जनगणना सुरू केली असून, त्यामागेही भाजपच्या जातीय समीकरणांवर कुरघोडी करण्याचाच विचार आहे. ईडी व सीबीआयला हाताशी धरून, विरोधी पक्षांना भयशंकित करणे आणि त्यानंतर दबावाखाली आणणे, हे भाजपचे धोरण आहे. त्यामुळेच भाजपला आक्रमकपणे विरोध करण्याची हिंमत नितीशकुमार, राहुल किंवा केजरीवाल यांच्यासारखे स्वच्छ चारित्र्याचे नेतेच दाखवू शकतात. समोर चांगले पहिलवानच नसल्यामुळे, सत्ताधारी भाजपमधील अनेकांचा उन्माद वाढलेला आहे. देशविरोधी पक्षमुक्त करणे, हे आपले उद्दिष्ट असल्याचा पुकारा भाजप अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी केला होता.
देशात विरोधी पक्ष प्रभावशून्य असेल, तर लोकशाहीमधील संतुलन ढळते. लोकांमध्ये असंतोष वाढत असून, राजकीय प्रक्रिया अशीच दडपून टाकली, तर त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटेल, याची जाणीव झाल्यानंतर एकेकाळी इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली होती. तुरुंगातून सुटलेल्या नेत्यांनी बाहेर पडल्यानंतर तातडीने निवडणुकांना सामोरे जाण्याची तयारी सुरू केली. विरोधकांनी एकत्र आले पाहिजे, या निर्णयाप्रत हे नेते आले. जयप्रकाश नारायण यांच्या प्रयत्नांमुळे जनता पक्षाच्या स्थापनेची प्रक्रिया सुखरूपपणे पार पडली. संघटना कॉंग्रेसचे नेते मोरारजी देसाई जनता पक्षाचे अध्यक्ष झाले आणि भारतीय लोकदलाचे नेते चौधरी चरणसिंग यांच्याकडे उपाध्यक्षपद सोपवण्यात आले. त्यामुळे उशीर झाला असला, तरीही आजही अशाप्रकारे ऐक्य होऊ शकते. केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी विरोधी ऐक्याचे वर्णन “महाठगबंधन’ केले असून, हे उद्गार अत्यंत घृणास्पद आहेत. म्हणूनच या राजवटीविरुद्ध सर्व विरोधी पक्षांनी क्षुल्लक मतभेद बाजूला ठेवून, “हम एक हैं’ हा नारा दिला पाहिजे.