पुणे -“विद्यार्थ्यांनी जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास बाळगून आयुष्यात चांगले काम करुन यशस्वी व्हावे. कोणतेही काम छोटे नसते. त्यामुळे कष्टाची लाज बाळगता कामा नये. शिक्षणासोबतच सामाजिक बांधिलकी जपण्याला अधिक प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे,’ असे मार्गदर्शन मान्यवरांनी येथे केले.
दैनिक “प्रभात’ आणि अशोक चंदुलाल गांधी चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या विद्यमाने घोले रस्ता येथील पंडित जवारहरलाल नेहरू सांस्कृतिक भवन येथे राज्यातील गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील उच्च शिक्षणासाठी शिष्यवृत्ती प्रदान सोहळा शनिवारी आयोजित करण्यात आला होता.
यावेळी कॉसमॉस बॅंकेचे अध्यक्ष सी.ए. मिलिंद काळे, पु. ना. गाडगीळ अँड सन्सचे संचालक, सीईओ व गार्गी फॅशन ज्वेलरीचे संचालक अमित मोडक, दिशा परिवारचे कार्याध्यक्ष राजाभाऊ चव्हाण या प्रमुख मान्यवरांच्या हस्ते 72 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती धनादेशाचे वितरण करण्यात आले. भारावलेल्या वातावरणात पार पडलेल्या या कार्यक्रमास दैनिक “प्रभात’चे सरव्यवस्थापक बी. एल. स्वामी, कार्यकारी संपादक अविनाश भट, व्यवस्थापक सी.ए. रवीकुमार इंडी आदी उपस्थित होते.
दैनिक “प्रभात’ने गेल्या १२ वर्षांपासून सुरू असलेला “राज्यातील गरजू व गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीच्या माध्यमातून शिक्षणासाठी आर्थिक मदत’ करण्याचा उपक्रम यंदाही यशस्वीपणे राबविला. या कार्यक्रमात प्रमुख मान्यवरांनी विद्यार्थ्यांना बहुमूल्य मार्गदर्शनही केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दैनिक “प्रभात’चे कार्यकारी संपादक अविनाश भट यांनी केले. सूत्रसंचालन सृष्टी गीते, तर आभार श्रीनिवास वारुंजीकर यांनी मानले.
विद्यार्थ्यांनो, सामाजिक कार्यासाठी सदैव सक्रियता बाळगा : मिलिंद काळे
“विद्यार्थ्यांनी जीवनाकडे बघण्याची दृष्टी बदलली पाहिजे. आयुष्य चांगले घडवता आले पाहिजे. आपण समाजाला काही तरी देणे लागतो अशी वृत्ती, भावना प्रत्येकाने ठेवायला हवी. सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून गरजवंताना मदत करण्याचा ध्यासही कायम असायला हवा आहे,’ असे मार्गदर्शन कॉसमॉस बॅंकेचे अध्यक्ष सी.ए. मिलिंद काळे यांनी यावेळी केले. “केवळ शिक्षण हेच सर्व काही असल्याच्या भ्रमातून विद्यार्थ्यांनी बाहेर पडायला पाहिजे.
विद्यार्थ्यांनी विविध कला, गुण जोपासण्याची गरज आहे. शिक्षणाला व्यावहारिक समजाची जोड मिळाल्यास आयुष्यात निश्चित यश मिळणार आहे. यश मिळाले तरी सामाजिक बांधिलकी कधीच विसरू नका. सामाजिक कार्याच्या जबाबदारीचे भान ठेवून सतत सक्रीयपणे कार्यरत राहिले पाहिजे,’ असा सल्ला काळे यांनी विद्यार्थ्यांना दिला. “मित्रांची चांगली संगतच माणसाला घडवित असते,’ असे म्हणत काळे यांनी आपल्या आयुष्यातील अनेक जुन्या आठवणींना उजाळाही दिला. दैनिक “प्रभात’ने इंटरर्नशीपचा उपक्रम राबवण्याची तयारी दर्शवल्यास त्यास कॉसमॉस बॅंकेकडून सहकार्य करण्यात येणार असल्याचेही काळे यांनी स्पष्ट केले.
आयुष्याच्या यशस्वीतेकडे वाटचाल करा : अमित मोडक
दैनिक “प्रभात’, अशोक चंदुलाल गांधी चॅरिटेबल ट्रस्ट या संस्था सामाजिक कार्यासाठी आपला अमूल्य वेळ देतात, ही बाब कौतुकास्पदच आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या गरजेच्या काळात या संस्थांकडून आर्थिक मदत केली जाते. त्यामुळे भविष्यात विद्यार्थ्यांनी समाजासाठीही काही तरी कार्य करण्याचे ध्येय ठेवले पाहिजे. केवळ मदत घेण्याची प्रवृत्ती न ठेवता देण्याचीही प्रवृत्ती ठेवायला हवी आहे,’ असे मार्गदर्शन पु. ना. गाडगीळ अँड सन्सचे संचालक व सीईओ अमित मोडक यांनी यावेळी केले.
“कोणतेही काम छोटे नसते. छोट्यातला छोटा माणूसही कष्ट केल्यास मोठा होऊ शकतो. विद्यार्थ्यांनी केवळ खूप शिक्षण घेतले म्हणजे मोठे झाल्याचा समज मनातून काढून टाकण्याची गरज आहे. विद्यार्थ्यांनी चांगल्या कामाला प्राधान्य देत मोठे होऊन आयुष्याच्या यशस्वीतेकडे वाटचाल करायला पाहिजे,’ असेही मोडक यांनी सांगितले. पुढील वर्षी दहा विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीचा खर्च उचलण्याची तयारीही मोडक यांनी यावेळी दर्शविली आहे.
विद्यार्थ्यांनी समाजाचा आधार व्हावे : राजाभाऊ चव्हाण
“गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यासाठी दैनिक “प्रभात’ने पुढाकार घेतला असल्याने मदत मिळणारे विद्यार्थी भाग्यवानच आहेत. विद्यार्थ्यांनी मदतीच्या आधारावर चांगले नागरिक बनण्याकडे लक्ष केंद्रीत करायला हवे आहे. शिक्षणातून विकास करुन भविष्यात अन्य विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याचा विचारही आत्मसात करायला पाहिजे.
विद्यार्थ्यांनी समाजाचा आधार बनायला हवे आहे. केवळ आर्थिक मदत घेऊन न थांबता व्यक्तिमत्व विकास, समाजातील घडणाऱ्या घडामोडींकडेही लक्ष दिले पाहिजे. आपल्यातील विद्यार्थीपण सतत जागृत ठेवून उत्तम करिअर व्हावे, यासाठी अभ्यास करुन मेरिट सिद्ध करुन दाखविण्याची इच्छाशक्तीही विद्यार्थ्यांनी बाळगली पाहिजे,’ असा सल्ला राजाभाऊ चव्हाण यांनी विद्यार्थ्यांना दिला.