– डी. बी. जगत्पुरिया
“रानगर्भातील जखमा’ हा आदिवासी साहित्याचे भाष्यकार प्रा. डॉ. विनायक तुमराम यांचा कवितासंग्रह. “सलामीच्या स्वातंत्र्या! तू कुठे आहेस?’ या कवितेतून आदिवासींच्या मनातील अगणित वेदनांना मुखर करतात. ते म्हणतात –
गुंडशाही, झुंडशाही, भ्रष्टाचार, जातीयता,
धर्मांधता, अन्याय, अत्याचार,
शोषण यांच्या युतीने
तुला बेडीबंद करून टाकले आहे
येथील पोथीनिष्ट, परंपराशरण आवेगाने
छाटून टाकले तुझे समता व न्यायाचे उड्डाणपंख
समूहमनाच्या मनातील अमोघ यातना, अफाट दु:खच या क्रोधाच्या मुशीतून उफाळला आहे. “आदिवासी मेळावा’ या कवितेतून कवी आदिवासींच्या सर्व प्रकारांची नावं घेत एक चित्रदर्शी प्रसंग उभं करतो. यातल्या दलसू गोंड याने उपस्थित केलेल्या अवघड, प्रश्नांचं उत्तर नेताजीकडे नसतं. आपल्या आदिवासी बांधवांना स्वधर्मशोधायचं आवाहन करतो. तो म्हणतो –
निसर्गी वसतो धर्म तुझा
अणूरेणूत नांदते तुझी संस्कृती
समता तुझे जीवनमूल्य
सोड अंधश्रद्धा अन् विकृती
“झुंज रानातली’ या कवितेत पोटासाठी जंगलात गेलेली अंगावर आलेल्या हिंस्त्र अस्वलाशी निकराची झुंज देणारी आदिवासी रणरागिणी बायजा भेटते. कवीने कवितेतून उभी केलेली ही नायिका मनामनात ऊर्जा भरते. परिवर्तन होऊन तिला खरे स्वातंत्र्य कधी मिळणार? हा प्रश्न निर्ढावलेल्या सत्तादासांना विचारते.
शासकीय योजनांपासून वंचित ठेवलेल्या आदिवासींच्या विकासासाठी झपाटलेला हा कवी आहे. त्यांचच युद्ध तो लढायला निघाला आहे. म्हणून तो म्हणतो-
लहरीनुसार त्यांच्या वाहतात रानवारे
सगळेच गूढ त्यांचे संकेत अन् इशारे
हा कवी या समस्त लोकांच्या वतीने सांगतो की, या शोषित लाकांचं दु:ख, यातना, वेदना समजून घ्या. अन्याय सोसतात म्हणून असंही समजू नका की, ते उठाव करणार नाहीत. ते उठाव करतील तेव्हा तुम्हाला पळायला वाट सापडणार नाही. कवी जीवाच्या आकांताने आदिवासींची समस्त रानात, जंगलात, वनात राहणाऱ्या जीवांची तगमग अक्षरबद्ध करतो. सत्तेचे ठेकेदार, व्यवस्थेचे सरंजामदार इथल्या मूल निवासींना वनवासी म्हणतात. कवी त्यांच्यासाठी ठामपणे कवितेचं, अक्षरांचं शस्त्र घेऊन उभा आहे. वनसंस्कृती उन्नत करण्याऐवजी ती नष्ट करण्याचे धूर्त डाव या चळवळीतल्या जाणत्या कवीला ज्ञात आहेत. हा धूर्त डाव तो ओळखून आहे.
आदिम मूळ संस्कृती जी आहे ती माय माझी
हिणवी कुणी तिला हो घायाळ अस्मिता माझी
या आदिम संस्कृतीला माय म्हणणारा हा विशाल हृदयाचा कवी तिच्यासाठी युद्धघोष करतोय. तो त्यासाठी सर्वस्व पणाला लावायला तयार आहे. जल, जमीन आणि जंगलवर त्यांचा मूलभूत हक्क असताना त्यांनी लंगोटी लावून, माय मावल्यांनी फडकं गुंडाळून का फिरावं? हा प्रश्न काळीज कुरतडून टाकणारा आहे.
प्रकाशक – विभा प्रकाशन / पृष्ठ – 92, मूल्य – 80 रु.