पुणे – गरजू व्यक्तींना मदत करणे, प्रसंगी आपल्या पदराचे पैसे घालून त्या व्यक्तीच्या गरजेची पूर्तता करणे आणि सर्वांशी संवादाच्या माध्यमातून कायम जोडून घेणे हेच महाराष्ट्र विद्यार्थी सहायक समितीच्या कामाचे वैशिष्ट्य आहे. त्यामुळेच समितीने अनेकांच्या मनात आपले स्थान निर्माण केले आहे. हेच कार्य यापुढेही कायम ठेवत समितीला आणखी उंचीवर नेण्याची मोठी जबाबदारी पार पाडण्यासाठी आपण सज्ज आहे असा विश्वास समितीचे नवनियुक्त सचिव प्रसाद आबनावे यांनी व्यक्त केला आहे.
शहरातील शिक्षण क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केलेल्या विद्यार्थी सहायक समितीच्या सचिवपदी नियुक्त झाल्याप्रसंगी आबनावे यांनी डिजिटल प्रभात’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी समितीच्या स्थापनेमागची प्रेरणा, स्थापनेपासून आजपर्यंतचा प्रवास, समितीच्या यशामध्ये दिवंगत सचिव डॉ. विकास आबनावे यांनी दिलेले योगदान आणि यापुढील काळात समितीच्या प्रवासाची उद्दिष्टये अशा विविध मुद्द्यांवर प्रकाश टाकला.
ते म्हणाले,”” समितीच्या माध्यमातून शिक्षणाच्या प्रवाहात आलेली माजी विद्यार्थ्यांनी आज विविध क्षेत्रात यश मिळवत आपला ठसा ऊमटवला आहे. तर आगामी पिढीदेखील विविध कौशल्य आत्मसात करत, भविष्यातील वाटचालीसाठी स्वत:ला घडवत आहे. या आजी-माजी विद्यार्थ्यांची एक मोठी फळी समितीमागे खंबीरपणे उभी असून, त्यांच्या साथीने समिती आपली पुढील उद्दीष्टे गाठण्यासाठी सज्ज झाली आहे. लवकरच समितीच्या प्रवासातील एक सकारात्मक आणि अधिक आश्वासक बदल आपल्या सर्वांना पहायला मिळेल.”
महाराष्ट्र विद्यार्थी सहायक समिती लवकरच आपल्या 100 व्या वर्षात पदार्पण करत आहे. यानिमित्ताने समितीने काही उद्दिष्टये ठरविली असून, याबाबतचा “मिशन 100′ हा उपक्रम लवकरच ते घोषित करणार आहे. हे मिशन 100 म्हणजे नेमके काय आहे? याबाबत समितीचे संचालक प्रथमेश आबनावे यांनी माहिती दिली.
मिशन 100 अंतर्गत समिती आणखी काही नवीन अभ्यासक्रम सुरू करणार आहे. तसेच विविध संस्था आणि विद्यापीठांच्या माध्यमातून अनेक महत्वपूर्ण उपक्रम राबविले जाणार आहे, असे आबनावे यांनी सांगितले.