- पालकांच्या तक्रारीनंतर पुन्हा अर्ज कन्फर्म झाल्याचे संदेश
पुणे – बालकांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत (आरटीई) च्या 25 टक्के राखीव जागांसाठी अर्ज केले, मात्र ते डिलिट झाल्याचे प्रकार समोर आले आहेत. त्यामुळे पालकांमध्ये संभ्रमावस्था असून, त्याबाबत शिक्षण विभागाकडून माहिती घेतली जात आहे.
अर्ज करण्याची अंतिम मुदत मंगळवारी संपली. त्यानंतर पालकांना तुमचा अर्ज डिलिट झाल्याचा संदेश आला. पुण्यासह इतर जिल्ह्यांतील सुमारे सातशे जणांचे अर्ज डिलिट झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. हा प्रकार नेमका कशामुळे झाला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
दरम्यान, अर्ज डिलिट झाल्याचा संदेश आल्यावर काही पालकांनी पुणे जिल्हा परिषदेत शिक्षण विभागात धाव घेतली. असा इतर काही पालकांच्याबाबत देखील प्रकार घडल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी सर्व पालकांकडून अर्ज घेतले. त्याबाबत जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकाऱ्यांनी शिक्षण संचालकांना पत्र पाठवून पालकांचे नावे पाठवली.
त्या पत्रात म्हटले आहे, पालकांनी त्यांच्या पाल्यांचे अर्ज आरटीई अंतर्गत सबमिट केले आहेत, परंतु मंगळवारी (दि.30) रात्री अकराच्या सुमारास अर्ज डिलिट झाल्याचा संदेश आला आहे. हे अर्ज पालकांनी डिलिट केलेले नाहीत. कोणी डिलिट केले हे पालकांना माहिती नाही, त्यामुळे डिलिट झालेले सर्व अर्ज पुन्हा सिस्टिमवर घ्यावेत. त्यानंतर संध्याकाळी उशिरा काही पालकांना पुन्हा अर्ज कन्फर्म झाल्याचे संदेश आले.
या गोडबंगालामुळे पालकांमध्ये आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेबाबत उलट-सुलट चर्चा सुरू झाली आहे. आरटीईच्या प्रवेश प्रक्रियेची लॉटरी येत्या 6 एप्रिल रोजी काढण्यात येणार आहे. त्याच्या अगोदरच असा प्रकार घडल्याने पालक शंका व्यक्त करत आहेत. हा प्रकार नेमका कशामुळे घडला याची चौकशी करण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.
आरटीईचे पोर्टल एनआयसीने बनवलेले आहे. आयपी अड्रेस मिळवणे, किती पालकांच्या बाबत हे घडले आहे याचा अभिप्राय संचालक कार्यालयाकडून घेतला जात असून, तपास सुरू आहे. मुलांचे नुकसान केले जाणार नाही, त्यांना सिस्टिमध्ये ठेवले जाणार आहे. पालकांनी हवालदिल होऊ नये.
– सुनील कुऱ्हाडे, शिक्षणाधिकारी, प्राथमिक, जि.प. पुणे.