पुणे – जिल्हा परिषदेकडून यंदा पहिल्यांदाच वैयक्तीक लाभ योजनेंतर्गत (डीबीटी) ऑनलाइन अर्ज मागवले. त्यानुसार 1 हजार 688 अर्जदारांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. 13 पैकी केवळ 5 तालुक्यांनी चांगला प्रतिसाद दिला. चार तालुक्यांमध्ये अल्प, तर तीनमध्ये अत्यल्प प्रतिसाद मिळाला. पुरंदर तालुक्यातून एकही अर्ज आल्याची नोंद नाही.
जिल्हा परिषदेच्या कृषी, पशुसंवर्धन, महिला व बालकल्याण तसेच समाजकल्याण विभागाकडून डीबीटी योजना राबविली जाते. यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज भरण्याची मुदत होती. त्याला आंबेगाव, बारामती, जुन्नर, इंदापूर आणि खेड याच तालुक्यांतून चांगला प्रतिसाद मिळाला.
जुन्नर तालुक्यातून सर्वाधिक अर्ज आले. भोर, दौंड, हवेली आणि मावळ या तालुक्यांतून अल्प, तर मुळशी, शिरूर आणि वेल्हे तालुक्यांतून अत्यल्प प्रतिसाद मिळाला. अर्जदारांनी ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर संबंधीत ग्रामसेवकांकडून तो संमत करून पुढे पाठविला जातो.
त्यानुसार 12 तालुक्यांतून एकूण 1 हजार 688 अर्ज प्राप्त झाले. मात्र, पुरंदर तालुक्यातून एकही अर्ज अद्याप आलेला नसून, ग्रामसेवकांकडून हे अर्ज संमत झाले नसल्यामुळे आकडे अद्याप प्राप्त झाले नसल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.