गुवाहाटी – आसाम सरकारने सरकारी मदरसे बंद करण्याचा निर्णय घेतला असला तरी राज्यातील खासगी मदरसे मात्र कोणत्याही स्थितीत बंद केले जाणार नाहीत, कारण त्यामुळेच येथील मुस्लीम जिवंत आहेत, असे आसाम विधानसभेचे उपसभापती आणि ज्येष्ठ भाजप नेते अमिनुल लष्कर यांनी म्हटले आहे.
आसाम सरकारने सरकारी मरदसे आणि संस्कृत पाठशाळा बंद करण्याचा निर्णय घेतला असून त्याची अधिसूचना याच महिन्यात काढली जाणार आहे. त्या पार्श्वभूमीवर बोलताना त्यांनी हे प्रतिपादन केले.
कचर जिल्ह्यातील एका मदरशाचा पायाभरणी समारंभ अमिनुल लष्कर यांच्या हस्ते झाला त्यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले की, याच मदरशातून मौलाना आणि काजी तयार होतात. मशिदींचे इमामही यातूनच तयार होत असतात. त्यामुळे खासगी मदरसे बंद केले जाणार नाहीत.
फक्त सरकारी मदरसे बंद केले जात आहेत. सरकारी खर्चाने धार्मिक शिक्षण देणे योग्य नाही या भूमिकेतून संस्कृत पाठशाळाही बंद करण्यात आल्या आहेत. सरकारने खासगी मदरसे बंद केलेले नाहीत, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सरकारी मदरसे बंद करण्याचा मुस्लीम समाजावर काहीही विपरीत परिणाम होणार नाही, असे विधानही त्यांनी केले. या विषयावरून कॉंग्रेस किंवा अन्य राजकीय पक्षांनी राजकारण करू नये, असे आवाहनही त्यांनी केले.