राजकारणी, पत्रकार, मुत्सद्दी, साहित्यिक, चित्रकार अशा अनेक छटा असलेले व्यक्तिमत्त्व. नोबेल पारितोषिक मिळवणारे एकमेव पंतप्रधान म्हणून त्यांची इतिहासात नोंद आहे. या व्यक्तिमत्त्वाचा अवाका लक्षात येण्यासाठी एवढंच वर्णन पुरेसं आहे.’
सर विन्स्टन लिओनार्ड स्पेन्सर चर्चिल यांचा जन्म 30 नोव्हेंबर, 1874 रोजी ब्रिटनच्या उमराव घराण्यात झाला. ब्रिटनचे खासदार असलेले त्यांचे वडील बंडखोर, सडेतोडपणाबद्दल प्रसिद्ध होते. गर्भश्रीमंत कुटुंबात चर्चिल यांचं बालपण ऐशोआरामात गेलं. घरातच प्राथमिक शिक्षण दिल्यानंतर ते प्रख्यात हॅरो विद्यालयात गेले. पुस्तकी शिक्षणात फारसा रस नसलेले, बाहेरच्या जगाविषयी जिज्ञासा असलेले विद्यार्थी म्हणून ते तिथं परिचित होते.
त्यानंतर त्यांनी सैनिकी शाळेत प्रवेश घेतला. तिथलं मोकळं वातावरण, मैदानी खेळ अशा गोष्टींमुळे त्यांचे व्यक्तिमत्त्व येथे चहूबाजूंनी विकसित झाले. 1895 मध्ये ते सैन्यात भरती झाले. तिथून सुट्टी मिळवून “लंडन डेली ग्राफिक’ या नियतकालिकामध्ये बातमीदार म्हणून काम करू लागले. 1896-97 या काळात त्यांनी पुन्हा काही काळ सैन्यात नोकरी केली. या काळात ते भारतातही होते. सैन्यात नोकरीच्या काळातही त्यांच्यातला पत्रकार शांत बसला नाही.
याच काळात मालकंद खोऱ्यातल्या एका छोट्या युद्धात त्यांनी भाग घेतला. या काळात त्यांनी जी टिपणं आणि नोंदी केल्या त्याच्या आधारावरच “द स्टोरी ऑफ मालकंद फिल्ड फोर्स’ (1898) हे पुस्तक लिहिलं. हे त्यांचं साहित्यातलं पदार्पण. बातमी घडवण्यापेक्षा ती लिहिणं, म्हणजेच एखाद्या अभिनेत्यापेक्षा समीक्षक होणं हे अधिक चांगलं आहे,’ असं त्यांनी या पुस्तकात लिहिलंय.
पुढे ते “लंडन मॉर्निंग पोस्ट’ या नियतकालिकासाठी आफ्रिकेतून बातमीदारी करू लागले. त्या काळात बोअरचं युद्ध सुरू होतं. त्यात ते शत्रूच्या हाती सापडले. कैदेतून त्यांनी शिताफीनं सुटका करून घेतली. या अनुभवांचं संचित त्यांनी पुस्तकरूपानं मांडलं. “द रिव्हर वॉर-ऍन अकाउंट ऑफ द रिकॉन्क्वेस्ट ऑफ द सुदान’ (1899) आणि “माय आफ्रिकन जर्नी’ (1908) या दोन पुस्तकांमध्ये त्यांनी या युद्धकाळातल्या थरारक आणि धाडसी प्रसंगांचं वर्णन केलं आहे.
हुजूर पक्षाच्या उमेदवारीवर ते 1900 मध्ये ब्रिटिश संसदेत निवडून गेले. अभ्यासू आणि मुद्देसूद मांडणीमुळे त्यांनी लवकरच तिथं ठसा उमटवला. हुजूर पक्षाच्या धोरणांवरून मतभेद झाल्यामुळे काही काळानंतर त्यांनी उदारमतवादी पक्षात प्रवेश केला. 1906 च्या निवडणुकीत उदारमतवादी पक्षाला मोठे बहुमत मिळाले. 1900 पासून सुरू झालेली त्यांची राजकीय कारकीर्द पुढे सुमारे पन्नास वर्षे चालली. या काळात त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदांवर काम केलं. 1906 मध्ये त्यांनी वडिलांच्या जीवनावर “लॉर्ड रॅन्डॉल्फ चर्चिल’ हे चरित्र लिहिलं.
खाणकामगारांच्या सुरक्षिततेसाठी कायदा, बेरोजगारांसाठी विमा योजना अशा अनेक समाजहिताच्या योजना आणि कायदे आणण्यात त्यांनी महत्त्वाचं योगदान दिलं. नौदलाची सशक्त आखणी आणि पुनर्रचना, त्याला वायूदलाची जोड देणं ही कामं त्यांनी केली.
अनेक लढायांमध्ये ब्रिटिशांना यश मिळालं; पण 1915 च्या गलीपोलीच्या युद्धात ब्रिटिश सैनिक मोठ्या प्रमाणात मारले गेले. त्यामुळे पुढच्या काळात स्थापन झालेल्या संयुक्त सरकारमध्ये चर्चिल यांच्याकडे नौदलाचं खातं देऊ नये, अशी मागणी करण्यात आली. त्यानुसार त्यांना कमी महत्त्वाचं खातं दिल्यामुळे त्यांनी पक्षाचा राजीनामा दिला आणि सैन्यात परतले.
त्यानंतर काही वर्षे विविध खात्यांची मंत्रिपदे भूषवल्यावर ते पुन्हा हुजूर पक्षात गेले. 1929 मध्ये उदारमतवादी पक्षाचं सरकार आलं. त्या पुढची सुमारे 10 वर्षे चर्चिल यांनी राजकीय वनवासात काढली. या काळात त्यांनी “द वर्ल्ड क्रायसिस’ (1923-31) हे सहा खंडांचे पुस्तक लिहून पूर्ण केले. यानंतर “मार्लबरो-हीज लाइफ अँड टाइम्स’ (1933-38) हे चार खंडांचे पुस्तकही त्यांनी पूर्ण केले. या दोन ग्रंथांमुळे त्यांना साहित्यिक वर्तुळात मानाचे स्थान मिळाले.
भारताला काही बाबतीत तरी स्वातंत्र्य मिळावं, असं त्यांचं मत होतं. त्यामुळे या विरोधी मत असणाऱ्या ब्रिटिश राजकारण्यांशी त्यांचे मतभेद होते. त्यामुळे बराच काळ त्यांना सरकारपासून दूर ठेवण्यात आलं. हिटलरच्या वाढत्या साम्राज्यवादी महत्त्वाकांक्षेला लगाम घालणं आवश्यक आहे, नाहीतर तो संपूर्ण जगावर युद्ध लादण्याची शक्यता नाकारता येत नाही, हे भाकित त्यांनी आधी केलं होतं पण त्याकडं कोणी फारसं लक्ष दिलं नाही.
1939 मध्ये दुसरे महायुद्ध सुरू झाले. त्यावेळी ब्रिटिश सरकारमध्ये चर्चिल आधी नौदल खात्याचे मंत्री बनले आणि वर्षभरातच पंतप्रधानपदी विराजमान झाले. हिटलर जगावर चाल करून येत होता. अनेक देश शरण जात होते. त्या काळात चर्चिल यांनी भाषणात रक्त, अश्रू, श्रम आणि घाम याशिवाय माझ्याजवळ देण्यासारखं काहीही नाही,’ असे म्हटले. याचा परिणाम म्हणून ब्रिटिश नागरिक आणि सैन्यात उत्साह निर्माण झाला. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात ब्रिटनचं धैर्य खचू न देण्यात चर्चिल यांचा सिंहाचा वाटा आहे.
युद्ध समाप्तीच्या काळात झालेल्या निवडणुकीत त्यांचा पक्ष पराभूत झाला. त्यानंतर त्यांनी सहा वर्षे विरोधी पक्षनेता म्हणून काम केले. दुसऱ्या महायुद्धाचा इतिहास सांगणारं “द सेकंड वर्ल्ड वॉर’ (1948-1953) हे सहा खंड आणि इंग्लंडच्या इतिहासाविषयीचं “ए हिस्ट्री ऑफ द इंग्लिश स्पीकिंग पीपल’ (1956-58) हे चार खंडही त्यांनी लिहिले.
संसदेत नि संसदेबाहेर उच्च पदाच्या जबाबदाऱ्या, विरोधी पक्ष-मतांच्या लोकांशी संघर्ष हे सगळं करत असताना जागतिक राजकारणावर हुकूमत गाजवणारा हा राजकारणी. पण तरीही अनेकविध विषयांचा मूलगामी अभ्यास, संशोधन करून इतिहासलेखनासह मानवी अस्तित्वाचा वेध घेण्याची ऊर्मी त्यांनी तसूभरही कमी होऊ दिली नाही. ऐतिहासिक आणि चरित्रात्मक वर्णनावरची पकड आणि मानवी मूल्यांचं रक्षणासाठीचं त्यांचं समर्पण बेजोड आहे. 1953 मध्ये नोबेल पारितोषिकानं सन्मानित करण्यात आलेल्या या विभूतीची जीवनयात्रा 24 जानेवारी, 1965 या दिवशी लंडन इथं संपली.
– डॉ. भालचंद्र सुपेकर