पुणे – कर्जावरील व्याज न दिल्याने एका अभियांत्रीकीच्या विद्यार्थ्याचे अपहरण करण्यात आले. अपहरण केल्यानंतर त्याला डांबून ठेऊन मारहाण करण्यात आली. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी सात ते आठ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. यातील दोघांना अटक करण्यात आली आहे.
याप्रकरणी अनिकेत राज (24,रा.बालाजी व्हिला, कात्रज) यानी दिलेल्या फिर्यादीनूसार गिरीष कदम, दिपक प्रदिपकुमार सिंग(20,रा.कात्रज), गणेश मानकर, नखील नंदकुमार कदम(23,रा.दत्तनगर)व त्याचे तीन ते चार साथीदार यांच्याविरुध्द गुन्हा दाखल झाला आहे. यातील दिपक सिंग व नखील कदम यांना अटक करण्यात आली आहे. ही घटना गिरीष कदम यांच्या स्टेन्जा हॉस्टेल व दिपक सिंग यांच्या सुभाष टेरेमधील सदनिकेत घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनूसार फिर्यादी अभियांत्रीकीचे शिक्षण घेतो. त्याने यातील एका आरोपीकडून एक लाख व दुसऱ्याकडून 40 हजार रुपये कर्जाऊ घेतले होते. दर महिण्याला 20 हजार रुपये परत देण्याच्या अटीवर हे पैसे घेतले होते. मात्र लॉकडाऊनमुळे त्याला पैसे परत करता आले नाही. त्याने मुद्दल दिली होती, मात्र व्याज देता आले नाही. यामुळे त्याला 18 मे रोजी आरोपींनी अपहरण करुन स्टेन्जा हॉस्टेलमध्ये डांबून ठेवले.
यानंतर तेथून एका सदनिकेत नेऊन डांबले. तेथे त्याला शिवीगाळ करुन मारहाण करण्यात आली. त्याने पैशासाठी वडिलांना फोनवर संपर्क साधला, तसेच डांबून ठेवले असल्याचे सांगितले. यानंतर त्याच्या वडिलांनी पोलिसांना फोन करुन घटनेची माहिती दिली. त्यानूसार पोलिसांनी अनिकेतची सुटका करुन दोघा आरोपींना अटक केली.