आपण विज्ञान शिकताना डार्विनचा सिद्धांत अभ्यासलेला आहे. त्यानुसार सजीव एकपेशीय प्राण्यापासून ते बहुपेशीय प्राण्यांत उत्क्रांतीत होत गेले; सर्व सजीवांचा एकच आद्य जीव आहे; उत्क्रांतीही हळूहळू छोट्या छोट्या बदलांतून होत गेली; छोट्या बदलांतून आणि नैसर्गिक निवड यांतूनच अखेर नवीन प्रजाती निर्माण झाल्या असं शिकलो होतो.
उपलब्ध पुराव्यांसह डार्विननं 1837 मध्ये हा सिद्धांत मांडला. सजीवांचं एकमेकांशी असलेलं नातं पुढे डीएनए किंवा गुणसूत्रांचा शोध लागल्यानंतर दृढ झालं. थोडक्यात, डार्विनचा सिद्धांत मान्य झाला आणि जीवसृष्टी ही उत्क्रांतीत झाली हे सर्वमान्य झालं.
पण 1996 साली मायकेल बेहे या जीवशास्त्रज्ञानं या सर्वमान्य सिद्धांताला आव्हान दिलं. त्यानं डार्विन्स ब्लॅक बॉक्स-द बायोकेमिकल चॅलेंज या पुस्तकाद्वारे आपली बुद्धिमान संरचनेची कल्पना मांडली. या संकल्पनेनुसार क्लिष्ट आणि गुंतागुंतीची रचना असलेले सजीव केवळ उत्क्रांतीमुळे निर्माण होणं अशक्य आहे.
याकरता नेहमी घड्याळजीचं उदाहरण दिलं जातं. ज्याप्रमाणे घड्याळासारखी गुंतागुंतीची वस्तू बघितली की अशी क्लिष्ट वस्तू बनवणारा घड्याळजी असतो हे आपल्याला ज्ञात होतं त्याचप्रमाणे गुंतागुंतीची रचना असलेले सजीव जेव्हा आपण पाहतो तेव्हा ती रचना करणारा कोणीतरी असला पाहिजे, असा प्रतिवाद केला जातो.
ही अर्थातच विचार करण्यासारखी गोष्ट आहे की 3 अब्ज वर्षांपूर्वी जर पहिला सजीव पृथ्वीवर निर्माण झाला असला तरी इतक्या वर्षांनंतर त्यापासून आपोआप म्हणजे उत्क्रांतीद्वारे मनुष्यासारखा प्रगत आणि जटिल रचना असलेला प्राणी निर्माण होऊ शकेल का? निदान असा प्राणी विकसित होण्यासाठी कुठल्यातरी शक्तीनं प्रेरित करणं आवश्यक आहे, असं बुद्धिमान संरचनावाद्यांना वाटतं.
बुद्धिमान संरचनावाद ख्रिस्ती धर्मातील निर्माणवादाशी (क्रिएशनिझम) निगडित असला तरी जागतिक पातळीवर, सर्व धर्मीयांनी आणि बुद्धिनिष्ठांनी विचार करण्यासारखी ही विचारधारा आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे उत्क्रांतिवाद मान्य केला तरी पहिला सजीव निर्माण झाला तेव्हा विशिष्ट रासायनिक पदार्थ एकत्र करून त्यात चेतना कशी निर्माण झाली का हा प्रश्न उरतोच. कारण उत्क्रांतिवादामध्ये याचं उत्तर नाही.
मात्र एक गोष्ट निश्चित आहे की, उत्क्रांतिवाद या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत नसला, तरी तो विचार पूर्णपणे टाकून देता येणार नाही. कारण त्याला पुष्टी देणारे अनेक पुरावे सापडले आहेत. परमेश्वराच्या मनात आले आणि त्याने (अनेक धर्मांत सृष्टीचा निर्माता तो का आहे, ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे) सृष्टी आणि विविध प्रजातींचे सजीव निर्माण केले असं एकदम ठरवून मोकळंही होता येणार नाही.
पाश्चिमात्य शिक्षणसंस्थांमध्ये काय नेमकं शिकवायचं यावर वाद-विवाद चालू आहेत. चर्चशी संबंधित शिक्षणसंस्था अर्थातच निर्माणवाद शिकवण्याचा आग्रह धरतात तर शास्त्रीय संशोधनाला वाहिलेल्या संस्था उत्क्रांतीच्या पारड्यात आपलं वजन टाकतात.
गंमत अशी आहे की, विज्ञानाला अनेक गोष्टींचा उलगडा करता आलेला नाही आणि सगळं ईश्वराच्या आधीन करूनही प्रश्न सुटत नाहीत. थोडक्यात, असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी असं म्हणणंही योग्य नाही आणि परमेश्वराला रिटायर करूनही चालणार नाही. प्रकाश हा नक्की कशा पद्धतीनं काम करतो ते सुद्धा विज्ञानाला नीटसं कळलेलं नाही कारण कधी तो तरंगांच्या स्वरूपात दिसून येतो तर कधी कणरूपानं प्रतीत होतो.
निसर्ग मानवाला त्याच्या बुद्धीला आव्हान देत असताना आढळून येतो. मात्र विज्ञानानं हताश न होता सदैव अज्ञाताचा शोध घेत राहिलं पाहिजे हेही तितकंच खरं. काही वैज्ञानिकांनी असं दाखवून दिलं आहे की या विश्वाच्या नियंत्रणामागे मोठी शक्ती असली पाहिजे. याचं कारण असं की कुठल्याही व्यवस्थेमध्ये गणितीय सुसूत्रता असायला हवी तसेच नियंत्रणासाठी अवलंबित्वाची श्रेणी आवश्यक आहे. विश्वामध्ये या दोन्ही गोष्टी स्पष्टपणे दिसून येतात.
पृथ्वीचं अस्तित्व सूर्यावर अवलंबून आहे तर सूर्याचं आपल्या आकाशगंगेवर अशी अवलंबित्वाची श्रेणी अस्तित्वात आहे. तर सर्व ग्रहगोलांच्या कक्षा शांकवीय छेदानुरूप (कोनिकल सेक्शन) असतात तसंच बव्हंशी समतल असतात. म्हणजे विश्वात गणितीय सुसूत्रताही आहे. यावरून विश्वाच्या नियंत्रणासाठी शक्तीचं अस्तित्व नाकारता येत नाही.
– श्रीनिवास शारंगपाणी