आपले आयुष्य खूपच सुंदर आहे. ते मजेत जगायलाच हवे. आजच्या दिवसाच्या पोटातच उद्याचे बीज रुजलेले असते. आपल्याला उद्या जर मजेत जगायला हवे तर आजच आपल्याला उद्यासाठी चांगले सकस बीज पेरायला हवे. आपल्या आयुष्यात सर्वच दिवस सारखे नसतात. ऊन-सावलीचा हा खेळ आयुष्यात चालूच असतो. आपल्या आयुष्यात जेव्हा आपण अनुकूल परिस्थितीत असतो त्यावेळेसही आपल्याला वस्तुस्थितीचे भान ठेवायला हवे.
जुन्या पिढीतील यशस्वी चित्रपट निर्माते, अभिनेते, दिग्दर्शक राज कपूर (14 डिसेंबर 1924 ते 2 जून 1988) हे लोकप्रियतेच्या शिखरावर असतानाही अतिशय संयमाने व व्यवस्थितच वागले. त्यांनी यश हे डोक्यात जाऊ दिले नाही. त्यांनी “जिस देश में गंगा बहती है’ (1960) हा चित्रपट निर्माण केला. त्यामध्ये प्राण हे “राका’ या खलनायकाच्या भूमिकेत आहेत. हा चित्रपट प्रदर्शित होण्याआधी राज कपूर यांच्या नावावर बरसात (1949), आवारा (1951), श्री 420 (1955) यांसारखे आणखीही काही लोकप्रिय चित्रपट होते.
तर त्यांचा स्वतःचा आर. के. स्टुडिओ (1948 ते 2019) होता. म्हणजेच जिस देश में… च्या वेळी राज कपूर हे चित्रपट सृष्टीतील एक “बडं प्रस्थ होतं’. त्यांच्याकडे यश, कीर्ती, पैसा, साधनसुविधा सर्व काही होते. आर. के. स्टुडिओच्या जिस देश में… मध्ये प्राण यांनी करारी आवाज व भेदक डोळ्यांसह उभा केलेला खलनायक आजही अंगावर काटे उभे करतो.
त्याकाळी प्राण हे नायकांपेक्षाही जास्त मानधन घेत असत. पुढे राज कपूर यांनी त्यांचा अति महत्त्वाकांक्षी चित्रपट “मेरा नाम जोकर’ (1970) हा तयार केला. तो तयार करायला 6 वर्षे लागली आणि राज कपूर यांनी प्रचंड पैसाही खर्च केला. त्याकाळी सुमारे एक कोटी रुपये खर्च चित्रपटावर झाला. पण तो चित्रपट आपटला आणि राज कपूर पूर्णपणे कर्जबाजारी झाले.
पुढे त्यांनी बॉबी (1973) हा चित्रपट तयार केला. एका मुलाखतीत सिम्मी गरेवाल यांनी ऋषी कपूर यांना विचारले की “तुला प्रस्तुत करण्यासाठी हा चित्रपट तयार केला का?’ त्यावर ऋषी कपूर उत्तरले की, “त्यावेळी लोकप्रियतेच्या कळसावर राजेश खन्ना होते आणि त्यांचे मानधन देण्याइतके पैसे आमच्याकडे नव्हते, म्हणून मला त्या चित्रपटात घेतले.’ बॉबी तुफान लोकप्रिय ठरला. त्याकाळी 30 कोटी रुपयांचा व्यवसाय बॉबीने केला आणि राज कपूर आर्थिक गर्तेतून बाहेर पडले. पण बॉबी चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्यात प्राण यांनी राज नाथ (ऋषी कपूर) यांच्या वडिलांची भूमिका साकार केली. ही भूमिका साकरण्याचे मानधन म्हणून प्राण यांनी केवळ “एक रुपया’ घेतला. त्याला कारण म्हणजे संकटात सापडलेल्या राज कपूर यांना मदत करण्यासाठी…
आता येथे एक लक्षात घ्या की, जिस देश में… किंवा आर. के. व्यतिरिक्त इतर चित्रपटांतून राज कपूर व प्राण यांनी एकत्र काम केले. त्यावेळी राज कपूर यांनी प्राण यांचेशी चांगले हितसंबंध जर जोपासले नसते तर प्राण यांनी संकटकाळी राज कपूर यांना मदत केली असती का? आपल्याला सभोवताली अर्ध्या हळकुंडाने पिवळे झालेले अनेक जण दिसतात. पण राज कपूर अर्ध्याच काय पूर्ण हळकुंडानेही पिवळे झाले नाहीत.
मेरा नाम जोकरच्या आधी यशाच्या शिखरावर असतानाही त्यांचे पाय जमिनीवरच होते. त्यामुळेच तर ते त्यांचा भविष्यकाळ सुकर करू शकले. संकटकाळी त्यांना मदत करणारे पुढे आले. हेच उलटेही होऊ शकले असते, पण तसे झाले नाही. आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात ऊन-सावलीचा खेळ चालूच असतो, पण आपणच आपल्या आजमधूनच उद्याचा दिवस सुकर करावयाचा असतो.
आपण यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी बरीच मेहनत घेतलेली असते. आपण घेतलेली ही सर्व मेहनत कधी एका क्षणात विफल ठरू शकते. बेन जॉन्सन या धावपटूने ऑलिम्पिक स्पर्धेत सुवर्ण पदक 24 सप्टेंबर 1988 रोजी मिळविले; पण त्याने उत्तेजक द्रव्यांचे सेवन केल्याचे नंतर निष्पन्न झाले. त्यामुळे त्याचे सुवर्णपदक काढून घेतले. आपण येथे एक लक्षात घ्यावे की पदकासाठीच्या शेवटच्या शर्यतीत अंतिम दहा खेळाडूंमध्ये येणे हेही खूप मुश्कील काम आहे. बेन जॉन्सनने तेथपर्यंत पोहोचण्यासाठी उत्तेजक द्रव्य सेवन करण्या व्यतिरिक्त बरीच मेहनत घेतलेली होती, पण पदक मिळविण्यासाठी फसवणूक करण्याचीसुद्धा त्याची तयारी असल्याने त्याने वाम मार्ग निवडला. पकडला गेल्यावर मात्र संपूर्ण कारकीर्द झाकोळली गेली.
बालवयापासून घेतलेली मेहनत विफल ठरली. यावरून आपण मात्र एक कटाक्षाने टाळायचे आहे ते म्हणजे कोणताही वाम मार्ग अवलंबायचा नाही. आपल्या यशाचा पाया भक्कमच असला पाहिजे. भले आपल्याला अपेक्षित ते यश साध्य करता आले नाही तरी चालेल. आपण पुन्हा जास्त चांगली तयारी करू आणि घवघवीत यश मिळवू यावर विश्वास ठेवायला हवा.
आपण यशाच्या शिखरावर असताना कधी प्रतिकूल परिस्थिती निर्माण होऊ शकेल हे सांगता येत नाही, पण प्रतिकूल परिस्थिती निर्माण होण्यास आपण कारणीभूत असता कामा नये. आपण योग्य काम जरी करू शकत नसलो तरी अयोग्य काम अजिबात करावयाचे नाही एवढे लक्षात ठेवले म्हणजे झाले. आपण आपल्या कर्माने स्वतः खड्ड्यात जावयाचे नाही. किंवा स्वतःहून कुऱ्हाडीवर पाय मारायचा नाही. जे आपल्या हातात आहे ते चुकायचे नाही. आपल्या मन मंदिराच्या गाभाऱ्यात बसून आपल्या मनोदेवतेला आपल्या चांगल्या कर्माचे पुष्प अपर्ण केले की मिळविलेले यश टिकविणे, ते वाढविणे हा मार्ग अधिक सुकर होऊ शकतो यात शंकाच नाही.
– अनिकेत भालेराव