बॅडमिंटनच्या खेळातील उत्सुकता कायम राहावी तसेच या खेळाकडे नवोदित खेळाडू, देशातील युवा पिढीही खेचली जावी यासाठी जागतिक बॅडमिंटन महासंघ (बीडब्ल्यूएफ) नियमावलीत बदल करणार आहे. त्यानुसार सध्या 21 गुणांच्या तीन गेमच्या आराखड्यात बदल करण्यात येणार असून 11 गुणांचे पाच गेम होणार आहेत. हाच निर्णय या खेळासाठी गेम चेंजर ठरणार आहे.
गेल्या महिन्यात बॅडमिंटनमधील पॉवर हाउस समजल्या जात असलेल्या इंडोनेशिया व मालदीव या दोन देशांच्या संघटनांनी केलेल्या शिफारशीनुसार आता नियमपुस्तिकेत बदल केले जाण्याची शक्यता आहे. 21 गुणांच्या तीन गेम्स खूप कमी कालावधीत संपतात त्यामुळे प्रक्षेपण हक्क, प्रायोजक तसेच अन्य सहप्रायोजकांकडून जास्त रकमेची मागणी करता येत नाही. काही सामने तर केवळ 45 ते 50 मिनिटांतच संपतात. त्यामुळे किमान एक तास सामना सुरू राहावा हेच उद्दिष्ट यातून दिसत अल्याची टीका जरी होत असली तरीही महासंघाला यातून आर्थिक स्थैर्यता लाभली तर ते खेळासाठी चांगलेच ठरेल.
पारंपरिक आराखड्यात बदल करण्यात येणार असून 11 गुणांचे पाच गेम व्हावेत अशी ही मागणी आता महासंघाच्या बैठकीत मंजूरही होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. बॅडमिंटनचे सामने 21 गुणांचे खेळवले जातात. तीनपैकी दोन गेम जिंकणारा खेळाडू सामन्यातः विजयी ठरतो. पण आता या खेळातील रंगत वाढवण्यासाठी तसेच जास्तीत जास्त प्रेक्षकांना या खेळाकडे वळवण्यासाठी 11 गुणांचे पाच गेम खेळवण्यात येणार असल्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे. महासंघाची 22 मे रोजी होणारी वार्षिक सर्वसाधारण बैठक याच नियमाभोवती फिरणार आहे. हा नियम जर अमलात आला तर भारतीय खेळाडूंसाठीही उत्सुकता वाढवणारा ठरणार आहे.
परदेशात हा खेळ जास्त रुजताना दिसत असला तरी त्याची पाळेमुळे भारतात रोवली गेली आहेत. या खेळाची सुरुवातही भारतातच झाली. मात्र, आता या खेळावर चीन, इंडोनेशिया, मालदीव, तैवान, कोरिया व जपान या देशांची मक्तेदारी निर्माण झाली. हा दबदबा आधी फुलराणी सायना नेहवाल व नंतर पी. व्ही. सिंधू यांनी काही प्रमाणात मोडून काढला. पण त्यात सातत्य राखण्यात यश आले नाही ही वस्तुस्थिती नाकारता येणार नाही. त्यातच परदेशी खेळाडू तंदुरुस्तीच्या बाबतीत आपल्या खेळाडूंपेक्षा जास्त जागरूक असतात हेदेखील खरे आहे. गेल्या दोन-तीन वर्षांचा लेखाजोखा मांडायचा म्हटला तर भारतीय बॅडमिंटनपटूंनी दुखापतीने माघार घेतल्याची टक्केवारी परदेशी खेळाडूंपेक्षा खूप मोठी आहे. जसे क्रिकेटच्या बाबतीत म्हटले जाते की एक कसोटी सामना खेळण्यासाठी जितकी तंदुरुस्ती आवश्यक असते त्यात टी-20 क्रिकेटचे चार सामने खेळता येतात.
त्याच धर्तीवर असे म्हणावे लागेल की 21 गुणांची एक गेम खेळण्यासाठी आवश्यक असलेल्या तंदुुरुस्तीत 11 गुणांचे दोन गेम खेळणे सहज शक्य आहे. अर्थात हे झाले तंदुरुस्ती या निकषावर मात्र, त्याचा लाभ केवळ महासंघालाच नव्हे तर प्रत्येक बॅडमिंटनपटूलाही होणार आहे. कारण प्रत्येक गेमनंतर मिळत असलेल्या काही मिनिटांच्या विश्रांतीमुळे सगळे खेळाडू संपूर्ण सामना संपेपर्यंत फिट राहतील व सामनेही रंगतदार होतील. महासंघाकडे आलेला हा प्रस्ताव मान्य झाला तर या खेळासाठी 11 गुणांच्या गेमचा नियम गेम चेंजर ठरेल यात शंका नाही.