क्रोधाद्भवति सम्मोहः सम्मोहात्स्मृतिविभ्रमः।
स्मृतिभ्रंशाद् बुद्धिनाशो बुद्धिनाशात्प्रणश्यति ।।
भगवद्गीता : 2-63 क्रोधामुळे गोंधळ निर्माण होतो, गोंधळामुळे स्मृतीत कल्लोळ निर्माण होतो आणि त्यातून बुद्धी भ्रष्ट होऊन सर्वनाशास कारणीभूत होते, असं भगवद्गीतेत म्हटलं आहे.
हल्ली “अँगर मॅनेजमेंट’- क्रोधव्यवस्थापन- व्यवहाराच्या सर्व क्षेत्रांमध्ये कळीचा मुद्दा झालेला आहे. आपल्याला कुणाच्या तरी क्रोधाला अनेक वेळा सामोरं जावं लागतं. हा संताप अप्रस्तुत होता, असं आपल्याला वाटत राहतं. अनावश्यक क्रोध टाळता न येणाऱ्या व्यक्तीला क्रोधव्यवस्थापनाची आवश्यकता असते.
एक बातमी : एकानं लग्न केल्यानं त्याला जिवलग मित्राला वेळ देता येत नव्हता. मित्राला राग येऊन तो त्याचा चक्क खून करतो. हा संतापाचा उद्रेक नि:संशय अवास्तव होता. मित्रानं क्रोधव्यवस्थापन केलं असतं, तर हा गुन्हा घडला नसता. “माझ्याकडे का पाहतोस?’ असं निरपराध माणसाला दटावून विचारल्यावर त्याच्यावर कोयत्यानं वार करण्याची काय गरज असू शकते? पण असं वृत्त आपण वाचतो. एखाद्याकडे पाहणं हा काही संताप येण्याजोगा प्रकार नक्कीच नाही. इथे क्रोधव्यवस्थापनाची गरज आहे.
अनेक वर्षांपूर्वी अशाच निष्कारण संतापलेल्या माणसाशी माझी गाठ अमेरिकेतील क्लीव्हलॅंड या शहरात पडली होती. मी बससाठी रांगेत उभा होतो. तोपर्यंत अनेक भले अमेरिकन मला भेटले होते. त्या कारणानं माझ्या चेहऱ्यावर स्मितहास्य होतं. मी सभोवताली पाहात होतो. अचानक समोरच्या एका कृष्णवर्णीय धिप्पाड माणसानं, “व्हाय आर यू स्मायलिंग ऍट मी?’ असा संतप्त प्रश्न केला. मी काहीसा भांबावून गेलो आणि त्याला काही उत्तर देणार तेवढ्यात रांगेतील माझ्या मागच्या माणसानं कानात सांगितलं, “डोंट डू एनीथिंग. डोंट आन्सर. ही माइट ईव्हन किल यू!’ त्या भल्या माणसाचा सल्ला ऐकून मी दुसरीकडे पाहू लागलो. तो कृष्णवर्णीय शिव्या देत तिथून चालता झाला. इथे त्या निष्कारण संतापलेल्या माणसाचं क्रोधव्यवस्थापन मौन पाळून मलाच करावं लागलं!
बायकोनं स्वयंपाक चांगला केला नाही म्हणून संतापणारे आहेत तर किरकोळ कुरबुरीवरून राग व्यक्त करणारेही आहेत. गाडीला धक्का लागला किंवा लागला असता यावर चिडून हल्ला केला असंही वाचनात येतं. बरं, राग सौम्य शब्दांत व्यक्त केला तरी एक वेळ चालू शकेल पण लाकडी दांडक्यानं, लोखंडी रॉडनं किंवा कोयत्यानं हल्ला करणं म्हणजे संतापानं बेभान होणं. हे निरोगी मनाचं लक्षण नव्हे.
माझ्याबरोबर कंपनीत काम करणारा वयानं कनिष्ठ परंतु ग्रेडनं थोडासा सीनियर एक्झिक्युटिव्ह छोट्याशा कारणानंही संतापायचा. एकदा तो माझ्याशी संतापून बोलू लागला. तेव्हा मी त्याला सांगितलं, “हे बघ, या तुझ्या चिडून बोलण्याचा माझ्यावर काही एक परिणाम होणार नाही. तू मात्र काळजी घेतली नाहीस आणि संयम राखू शकला नाहीस तर हा प्रकार तुझ्यावर बेतू शकतो हे लक्षात ठेव.’ काही महिन्यांनंतर त्याला हृदयविकाराचा जोरदार झटका आला. त्यातून वाचल्यावर त्यानं आता आपण संयमपूर्वक वागणार असल्याचं मला सांगितलं.
अलीकडे हिंसक पद्धतीनं संताप व्यक्त करण्याचे प्रसंग वारंवार घडत आहेत. यामागची मुख्य कारणं म्हणजे करोनामुळे आलेली जी बंधनं होती तसंच आर्थिक आणि इतर दडपणं. शांत ठिकाणी मन:शांती न अनुभवता आल्यामुळे खूप मोठा तणाव निर्माण होतो. तो एखाद्या ज्वालामुखीच्या उद्रेकाप्रमाणे किरकोळ कारणातून निर्माण झालेल्या प्रसंगातही अचानक प्रकट होतो. इतर अनेक मानसिक व्याधींप्रमाणे इथेही तणाव हेच मुख्य कारण आहे.
क्रोधव्यवस्थापनामधील मूलभूत उपाय हा आहे की आपण संतापाच्या मर्यादा ओलांडत असल्याचं ओळखणं आणि तिथेच तत्काळ थांबणं. काही काळ संतापाच्या कारणापासून दूर जाणं हा त्यानंतरचा टप्पा. यासाठी 1 ते 50 आकडे मोजण्याचा सल्ला दिला जातो. खोलवर श्वास घेऊन आत्मपरीक्षण करून अन्य मार्गानं झालेल्या घटनेतून बाहेर कसं पडता येईल याचा शांतपणे विचार करून मगच कृती करणं असं केल्यास संतापापासून मुक्ती मिळू शकेल. पहा प्रयोग करून काही उपयोग होतो का? अर्थात तुम्हाला क्रोधावर नियंत्रण मिळवण्याची आवश्यकता असली तर.
– श्रीनिवास शारंगपाणी