आई-बाबा, तुम्हाला सांगण्याचे माझ्यात धैर्य नाही. मला अगदी अस्पष्ट आठवते, मी लहानपणी खूप रडायची. माझ्या बालमनाला कळायचे नाही, माझ्या जवळ माझे कोणीच दिसत नव्हते. बागेत मी एकटीच मुलांकडे पाहात बसे. आई-बाबा कधीच माझ्याजवळ नव्हते. एक काका मात्र मला खूप प्रेमाने जवळ घ्यायचे. अचानक तुम्ही माझे आई-बाबा जवळ आले. खूप प्रेम करत. पण मनाचा एक कोपरा मात्र रिकामाच राहिला. मी कोण? पण मोठी होत गेले, कळलं आपले आई-बाबा आपल्यावर खूप प्रेम करतात.
आपल्याला काही झाले तर जीव व्याकुळ होतो त्यांचा. एवढे छान आई-बाबा कोणाकडेच नाही. मित्रांसोबत बोलतानासुद्धा खूप अभिमानाने तुमचे कौतुक करते. सतत मनात तुमचा विचार असतो आणि आता तुम्हाला फसवायचे शक्य नाही. याला फसवणे नाही म्हणणार, नकळत केलेली चूक… प्रामाणिक इच्छा कधीही पूर्णत्वास जाते हे खरं आहे. त्यातून मिळणारा आनंददेखील सात्त्विक असतो. पण मी तर तुम्हाला न सांगता घर सोडणार आहे’, असे तिने चिठ्ठीत लिहून ठेवले.
तू म्हणाला, आपण दोघेच एकमेकांना आहोत. तू जर अशी भोवऱ्यात, तळाशी गेली तर बुडणाऱ्या मला हात कोण देणार? तशी मी एकदम म्हणते, “कशाला दोघंही बुडा म्हणजे प्रश्न संपेल’. वा! छानच आहे. प्रश्न सोडवण्याची पद्धत “मुलगी तर गेली ना’ “पण ती जिवंत आहे ना’.
पळून तर गेली ना! फक्त तिच्या अचानक निर्णयांनी आपण उद्ध्वस्त झालो खरे. पण ठीक आहे ना! आपण किती दिवस असे बसून राहणार. ती पण हळूहळू रमायला लागली असेलच ना! दोघांनी कुढत बसण्यात, मरत मरत जगण्यात काय साध्य होणार. ती तर लग्न करून निघून गेली. लग्नच केलं आहे. जीव तर नाही ना दिला. पळून जाऊन लग्न करणारी खूप जण आहेत जगात. आपलीच एक मुलगी आहे का?
तुझे एकटेपण जाणवते. तुझी पोकळी भरून येणार नाही. मला हे कळत नाही का? प्रेमविवाह केला. आपणही केला. आपल्यालाही विरोध केला असता तर आपणही तेच केले असते. तू माझे सांत्वन करतोस, पण तुझी ही पद्धत चुकीची आहे. आपण दोघंही मूळ जखमेशी लपंडाव खेळतो असेच ना! ती पळून गेली म्हणून नाही तर मूल दत्तक घ्यायचे आणि ती मुलगी घ्यायची, हा आग्रहही माझाच. खरं तर मी तशी एव्हाना उभी राहिली असते. पण आता खूप सारं आठवतं. कसं घडत गेलं. तुझं परदेशी जाणं महत्त्वाचं ठरलं. माझं आई होणं टळलं.
तो स्वत:शी म्हणाला, ती बोलत होती. मी ऐकत होतो. तिच्या मनाला वाट करून देणे गरजेचे होतं. मी पण चुकलो होतो ना! ती कोलॅप्स झाली होती. सगळ्याला मी जबाबदार होतो. मला ती कळलीच नाही एवढं प्रेम करून.
खरंच आपण थोडे दिवसांसाठी जाऊन येऊ का, तुला बरं वाटेल. सगळीकडे छान असेल पण शेवटी “मन’ आहेच ना, त्याला कुठे कुत्र्या-मांजरासारखे सोडणार. अरे, रितेपण कसे भरून येणार. त्याला स्वतःची चूक कळली होती पण आता काय, हातातून सगळं गेलेलं होतं. सगळं आपल्या जवळ आहे. पैसा, प्रतिष्ठा, मनात उमेद आहे. एकच कमी स्वतःच हक्काचं मूल. खरं सांगू का, तीसुद्धा आपलीच होती. फक्त आपण जन्म दिला नाही. सगळे अधिकार होते. तरी तुझे रितेपण एकटीचे नाही. मी पण आहे तुझ्याबरोबर.
अशा गोष्टींनी आयुष्य थांबतं का? नाही ना रे, थांबत. मुलगी घरातून गेल्यावर आयुष्यात काय राहिलं. सगळं विसरून आपल्याला ओरखाडून तर गेली ना. दोघांचं दुःख एकच आहे. माझं दुःख माझं आहे ते तुझ्यामुळे आलेलं. मान्य केलं. पण आता मागे तर जाता येत नाही. शेवटी नियतीने चकवा दिला. जगल्याशिवाय आयुष्य कळत नाही. आपण दोघं होतो. नंतर तिघे झालो. जे घडायचे ते घडलं.
तू अपेक्षांचा परिघ तुझ्या पद्धतीने तयार केलास. आपण आपल्या आनंदासाठी मूल दत्तक घेतलं. त्याच्या आयुष्यातील निर्णयावर आपला अधिकार आपण कसा काय लादू शकतो. दत्तक मूल काय आणि स्वत:च काय एका विशिष्ट वयानंतर आपला अधिकार कमीच होतो. दु:ख तर तुझ्या एवढंच मलाही. माझ्या जगण्याचा श्वास आहे. श्वास दूर जाताना माझी तगमग होणारच. म्हणून आपल्याला आपलं आयुष्य, न आवडलेल्या पुस्तक मिटून ठेवावं तसं तर मिटून ठेवता येणार नाही ना! आयुष्यात वादळ येतं तेव्हा पाय घट्ट रोवूनच उभं राहायचं असतं. प्रश्न वादळाचा नाही, जे व्हायचे ते नुकसान होणार, ते जेवढा वेगाने येतं तेवढ्याच वेगाने निघून जातं. त्यात फक्त आपण किती सावरलो आहोत ते महत्त्वाचे.
हव्या असलेल्या माणसाचे नसणे हे खरे तर नसणे नसून फारच ठसठशीत आणि विव्हळ करणारे असेच असते हे सत्य पुनःपुन्हा मागे लोटताना थकायला होई. जणू मनाचे दोन भाग करून जगत आहे. पण इतका त्रास करून घेण्यापेक्षा तिच्या घरी जाऊन जर सरप्राइज दिलं तर… बघू…
(समाप्त)
– सुगंधा शिरवळकर