पुणे – महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेतील (विद्या प्राधिकरण) अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी गणवेश व ओळखपत्राची सक्ती करण्यात आली आहे. नियमांचे काटेकोरपणे पालन न केल्यास संबंधितावर कारवाई करण्यात येणार आहे. विद्या प्राधिकरणाच्या “आयएएस’ संचालकांनी आता अधिकारी, कर्मचाऱ्यांना शिस्त लावण्यासाठी वेगाने हालचाली सुरू केल्या आहेत.
विद्या प्राधिकरण ही शालेय शिक्षण विभागाची एक महत्त्वाची संस्था म्हणून ओळखली जाते. शालेय विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम निश्चित करणे, शिक्षकांना प्रशिक्षण देणे, शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी नावीन्यपूर्ण योजनांची आखणी करून त्याची अंमलबजावणी करणे यासारखी महत्त्वाच्या कामांची जबाबदारी विद्या प्राधिकरणाकडे आहे. दोन महिन्यापूर्वी फारशी इच्छा नसतानाही “आयएएस’ असलेल्या अमोल येडगे यांनी संचालक पदाची सूत्रे स्वीकारली. त्यानंतर लेटलतिफ व विनापरवानगी गायब होणाऱ्या अधिकारी, कर्मचाऱ्यांना चाप बसविण्यासाठी 3 ऑक्टोबरपासून बायोमेट्रिक प्रणालीद्वारेच हजेरी नोंदविण्याचा नियमही लागू करण्यात आला आहे.
अधिकारी व कर्मचाऱ्यांची वेशभूषा ही त्यांच्या व्यक्तीमत्वाचा अत्यंत महत्त्वाचा भाग ठरते. संचालकांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून चांगल्या प्रतीच्या वागणुकीची व व्यक्तीमत्वाची अपेक्षा व्यक्त केली आहे. अधिकारी, कर्मचाऱ्यांची वेशभूषा ही अशोभनीय, गबाळी व अस्वच्छ असेल तर त्याचा कामकाजावरही अप्रत्यक्ष परिणाम होत असतो. या बाबी विचारात घेऊन कार्यालयातील सर्व अधिकारी व कर्मचारीयांना कार्यालयीन वेळेत पोशाखासंदर्भात कशा पद्धतीने पेहराव असावा याबाबत नियमावलीच लागू केली आहे.
विद्या प्राधिकरणाचे सहसंचालक रमाकांत काठमोरे यांनी अधिकारी, कर्मचाऱ्यांना आदेशच लागू केलेले आहेत. दरम्यान गणवेश व ओळखपत्राबाबतच्या सूचनांची अंमलबजावणी करण्यात कुचराई करणाऱ्या संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांविरुद्ध वरिष्ठ अधिकाऱ्यांनी योग्य ती कारवाई करण्याबाबतही सूचित करण्यात आलेले आहे.