मुंबई- शिवसेना आमदारांनी पुकारलेले बंड महविकास आघाडी सरकारसाठी मोठा भूकंप ठरले आहे. सेनेच्या 39 आमदारांसह अन्य छोट्या पक्षाचे व अपक्ष असे जवळपास 50 आमदार आघाडीतून फुटले आहेत. अशातच राज्यात सरकार चालवण्यासाठी ठाकरे यांच्या सरकारकडे बहुमत आहे का असा प्रश्न उपस्थित होत आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी रात्री उशिरा राज्यपालांची भेट घेत सरकारला बहुमत सिद्ध करण्यास सांगावे अशी मागणी केली होती. विरोधीपक्ष भाजपची ही मागणी मान्य करत राज्यपाल कोश्यारी यांनी बहुमत चाचणीचा आदेश दिला आहे.
राज्यपालांनी दिलेल्या आदेशानुसार आता ठाकरे सरकारला उद्या सकाळी 11 ते सायंकाळी 5 दरम्यान बहुमत सिद्ध करावे लागणार आहे. यावेळी ठाकरे सरकार बहुमत सिद्ध करू शकणार का हे पाहावे लागणार आहे.
महावीकास आघाडी सर्वोच्च न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार?
दरम्यान, राज्यपालांनी बहुमत सिद्ध करण्याचे आदेश दिल्यानंतर महावीकास आघाडी सर्वोच्च न्यायालयात दाद मागू शकते. सेनेच्या आमदारांना देण्यात आलेल्या अपात्रतेच्या कारवाई विरोधातील याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने ही कारवाई 12 जुलै पर्यंत करू नये असे आदेश दिले आहेत.
यावेळी शिवसेनेच्या वकिलांनी दरम्यानच्या काळात बहुमत चाचणीचा आदेश आल्यास काय? असा सवाल उपस्थित केला होता. यावर न्यायालयाने आम्ही जर तर शक्यतांवर निर्णय देत नाही. असे झाल्यास न्यायालयाची दार उघडी आहेत असं सांगितलं होत. यामुळे बहुमत चाचणी पुढे ढलण्यासाठी ठाकरे सरकार सर्वोच्च न्यायालयात दाद मागते का हे पाहावे लागेल.