संपूर्ण जगात धर्माच्या नावावर दहशतवादाचा प्रसार करणाऱ्या बगदादीचा अखेर खात्मा झाला. अमेरिकेच्या डेल्टा फोर्सने त्याला ठार केले. दहशतवादाची आणि दहशतवाद्यांचीही पाळेमुळे कुठेतरी परस्परांशी जोडलेली असतात. त्यानुसार अबु बक्र अल बगदादीही ओसामा बीन लादेन याच्याशी कधीकाळी जोडला गेला होता. नंतरच्या टप्प्यात त्यांचे मार्ग वेगळे झालेत. मात्र, तरीही बगदादीवर लादेन अथवा त्याच्या अल-कायदा या दहशतवादी संघटनेचा प्रभाव होता. त्याच्याबद्दल बऱ्यापैकी माहिती गोळा करणाऱ्या पत्रकारांचा हा दावा आहे. धर्माच्या ज्ञानाच्या बाबतीत बगदादी निष्णात होता. मात्र, दहशत निर्माण करायची आणि त्याच्या आधारावर आपले काळेधंदे व चंगळवाद जोपासायचा असा काही त्याचा मानस नसावा. किमान याबाबतीत तो अन्य दहशतवाद्यांपेक्षा वेगळा ठरतो.
लादेन असेल अथवा मुल्ला उमर असेल अथवा अल जवाहिरी किंवा झरकावी असेल यांचे काही प्रभाव क्षेत्र होते. धर्माची भीती दाखवत त्यांनी तरुणांची माथी भडकावली. मात्र, आपल्या प्रभाव क्षेत्रात आपली हुकुमत चालावी एवढाच त्यांचा मर्यादित उद्देश होता. बगदादीला थोडे वेगळे जायचे होते. त्याला एक आदर्श किंवा मॉडेल राज्य स्थापन करायचे होते. धर्माच्या आधारानेच तेथील कारभार करायचा होता. नंतर स्वत:चा परिघ विस्तारायचा होता. त्यात सुरुवातीच्या टप्प्यात त्याला बऱ्यापैकी यश आले. भूभागाच्या भाषेत सांगायचे झाले, तर तो चांगलाच पसरत गेला. अचानक कोणती ताकद अथवा शक्ती मिळाली की ती योग्य ठिकाणी वापरण्यासाठी अथवा केंद्रित करण्यासाठी कुवत लागते. धार्मिक बाबतीत बगदादीचे ज्ञान अगाध असेल कदाचित. मात्र ताकद डोक्यात गेली की व्हायचा तोच शेवट होतो.
इसिस नावाच्या त्याच्या संघटनेने गेल्या काही काळात प्रचंड उच्छाद मांडला होता. गेल्या दशकभरातील त्याच्या या संघटनेच्या सदस्यांनी क्रौर्याची परिसीमा गाठली. काळजाचा थरकाप, रक्ताचे पाट, क्रूरतेची हद्द असले शब्दही थिटे पडावेत अशा घटना या काळात झाल्या. सामूहिक हत्याकांड, सामूहिक बलात्कार, वंश आणि पंथ पाहून केलेला नरसंहार, त्याची जाहिरातबाजी हे सगळे बगदादी आणि त्याच्या चेल्यांनी केले.
युरोप अथवा अमेरिका अथवा अन्य प्रगत राष्ट्रे सगळ्यांना या दहशतवादाची झळ पोहोचली. कामानिमित्त चुकीच्या ठिकाणी पोहोचलेल्यांचे अपहरण, प्रचंड छळवणूक आणि अनन्वित अत्याचार हाच प्रकार गेल्या दशकभरात होत होता. त्याची जगाने दखल घ्यावी आणि आपल्या कथित सामर्थ्यामुळे भयकंपीत व्हावे यासाठी या सगळ्या घटनांचे चित्रण करून ते प्रसारित करण्याचे अघोरी प्रकार झाले. इराक व लगतच्या पट्ट्यातील जो भाग बगदादीच्या प्रभावातून मुक्त करण्यात आला आहे, तेथे अजूनही बरेच मृतदेह सापडत आहेत. असंख्य लोकांना निर्दयतेने ठार करून त्यांची विल्हेवाट लावण्यात आली. हे सगळे करताना त्याने स्वत:ला मात्र शासनकर्ता घोषित करून घेतले. स्वत:च्या कृष्णकृत्यांवर बेमालूम पडदा टाकला. त्यांना धार्मिक अधिष्ठान देत आपली अमानुषता कशी न्यायसंगत आहे याचे प्रसारण केले गेले. हिंसा आणि द्वेषाचा प्रसार व्हायला फार वेळ लागत नाही. चार माथी भडकली आणि त्यांना हवा दिली की वणव्यासारख्या या गोष्टी पसरतात.
हल्लीच्या अत्याधुनिक माध्यमांच्या काळात त्यांना मदत करणारे हजारो अज्ञात हात मिळाले. काहींनी जाणीवपूर्वक मदत केली, तर काहींच्या अज्ञानाचा, भाबडेपणाचा वापर केला गेला. केवळ भारतच नव्हे, तर ब्रिटनसारख्या प्रगत आणि पुढारलेल्या देशातील सुशिक्षित आणि संपन्न घरांतील युवक, युवती बगदादीच्या कथित पवित्र मात्र अंतिमत: आत्मघाती ठरणाऱ्या विचारसरणीच्या कच्छपी लागले आणि अखेर त्यांनी स्वत:चा विनाश ओढवून घेतला. जो दुसऱ्याला विनाशाच्या वाटेने नेतो त्याचाही विनाश अटळ असतो. हे त्रिवार सत्य आहे. मात्र, तरीही वेगवेगळ्या कालखंडात, वेगवेगळ्या नावाने अशा शक्ती जन्माला येत असतात. किंबहुना त्यांना जन्माला घातले जाते. मोठे करण्यासाठी खतपाणी दिले जाते. ठराविक काळाने त्यांचा उदयास्त होत असतो. बगदादीचा उदय होण्यापूर्वी ओसामा बिन लादेन याची जगात चर्चा होती.
अमेरिका-रशिया संघर्षाच्या काळात अन्य काही नावे होती. यूबीएल या टोपण नावाने अमेरिकी संस्था लादेनला संबोधत असत. त्याचा भस्मासूर झाला आहे, याची जाणीव होऊनही त्याला रोखू न शकल्याची मोठी किंमत अमेरिकेला चुकवावी लागली. आताही बगदादीला ठार करून अमेरिकेने चांगलेच काम केले असले तरी त्यालाही विलंब झाला आहे. मात्र, अमेरिका अथवा संपूर्ण मानवजातीवरचे संकट टळले आहे, हे मानणे मूर्खपणाचे ठरावे. मुळात बगदादी मारला गेला आहे, यावर विश्वास बसणे तसे अवघडच. कारण यापूर्वी त्याची दोनदा अंत्ययात्रा काढण्यात आली होती. म्हणूनच रशिया आदी देशांनी बातमीच्या सत्यतेवर अविश्वास व्यक्त केलाच होता. मात्र, अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वत: पत्रकार परिषदेत घेऊन याची नाट्यमय घोषणा केल्यावर आता संशय निवळला असल्याचे मानायला हरकत नाही. तरीही एक विसरायचे नसते. ते म्हणजे लादेन अथवा बगदादी हे केवळ चेहरे असतात. अगोदर म्हटल्याप्रमाणे त्यांचा उदय आणि अस्त होत असला तरी त्याला हातभार लागत असतो तो आपापले हित साधणाऱ्या शक्तींचा.
एकाच समाजातील दोन पंथांमधील तेढ आणि संघर्षातून बगदादीचा जन्म झाल्याचे मानले जाते. जसा लादेन अथवा तत्सम मंडळींचा जन्म दोन सत्तांमधील तेढीतून झाला होता. मात्र, जेव्हा असा राक्षस तयार होतो आणि तो अनियंत्रित होतो, तेव्हा संपूर्ण मानवजातीचे प्रचंड नुकसान होत असते. सगळ्या जगाने विविध घातपातांच्या अनुषंगाने ते पाहिले आहे. तरीही काही शक्ती अथवा सत्ता त्यांना पोसण्याचे अथवा चिथावणी देण्याचे आणि त्यांचा आपल्या स्वार्थासाठी वापर करून घेण्याचे व त्यावर कडी म्हणजे निर्लज्जपणाने या सगळ्याचे समर्थन करण्याचे उद्योग करत असतात.
आज बगदादी मारला गेला आहे. त्याचा त्याच्या संघटनेला निश्चितच हादरा बसला आहे. मात्र, दरम्यानच्या काळात त्याने जे नेटवर्क तयार केले आहे, त्याला हादरे देण्याचेच नव्हे, तर उद्ध्वस्त करण्याचे काम अगोदर हाती घ्यावे लागेल. ते कधीच होत नाही. आता या नेटवर्कच्या विध्वंसाच्या कामात जी राष्ट्रे अथवा शक्ती अडथळे ठरतील त्यांचाही चोख बंदोबस्त करावा लागेल. अन्यथा एक दहशतवादी संपला तरी दुसरा कोणीतरी त्याची जागा घेत आपले सैतानी उद्योग अव्याहतपणे सुरूच ठेवत असतो. त्यामुळे जग पूर्ण सुरक्षित करायचे असेल, तर अगोदर यांना पोसणाऱ्यांनाही हात घालायला हवा.