ठाणे – खंडणी उकळण्याच्या प्रकरणी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात आणखी एक गुन्हा नोंद करण्यात आला आहे. परमबीर सिंह यांच्यासह अन्य 8 पोलीस अधिकाऱ्यांवर ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केतन मनसुखलाल तन्ना नामक व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधी देखील परमबीर सिंह यांच्याविरोधात बांधकाम व्यावसायिक श्यामसुंदर अग्रवाल यांनी केलेल्या खंडणीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून त्या प्रकरणाची चौकशी एसआयटीमार्फत करण्यात येणार आहे.
केतन तन्ना आणि त्यांच्या पत्नीला खंडणीसाठी धमकी देण्यात येत होती, असा आरोप तन्ना यांचे सह तक्रारदार सोनू जालान यांनी केला आहे. यामध्ये परमबीर सिंह यांच्यासोबतच माजी एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मा, रवी पुजारी, एन. टी. कदम, राजकुमार कोथमिरे आणि दोन पोलीस कॉन्स्टेबलचा समावेश असल्याचे जालान यांनी सांगितले.
दरम्यान, या प्रकरणात पोलीस अधिकाऱ्यांसोबतच इतरही अनेकांची नावे आहेत. त्यामध्ये विमल अगरवाल, त्यांची पत्नी, त्यांचा भाऊ, जुबेर मुजावर, मनीष शाह, रितेश शाह, बच्ची सिंह, अनिल सिंह यांची नावे गुन्ह्यामध्ये आहेत.