विजय सपकाळ
मेढा –“असं कधी होणार नाही, असं कधी झालं नाही!’ काळूबाईचा, आपल्या आईचा कौल आहे, गावातला राजकारण थांबवा, एक व्हा आणि विकास करा म्हणूनच थेट सरपंचपदाच्या दोन्ही उमेदवारांना समान मते पडली, अशा घोषणा देत अतिसंवेदनशील असलेलं तीर्थक्षेत्र कुसुंबी गावं निवडणुकीच्या निमित्ताने एक झालं. काळूबाईच्या नावान चांगभल करत सर्वांनी एकत्रित गुलाल उधळला. हातात हात घातला. मिठ्या मारल्या. “हम सब एक है,’ म्हणून “राजकारण गेल चुलीत’ असाचं संदेश देत चिठ्ठीद्वारे मारुती चिकणे यांना सरपंच केले.
मात्र, चिठ्ठी टाकण्यापूर्वी गाव म्हणून सर्व जण एकत्र आले आणि एक वेगळा अलिखीत निर्णय झाला. त्यानुसार त्यांनी मारुती चिकणे व साधू चिकणे या दोन्ही उमेदवारांना अडीच- अडीच वर्षे पज देण्याचा निर्णय झाला. चिठ्ठी निघेल त्याला प्रथम संधी. ठरल्याप्रमाणे मारूती चिकणे यांना प्रथम संधी मिळाली. अडीच वर्षाने त्यांनी राजीनामा देऊन साधू चिकणे यांना सरपंच करण्याचे ठरले. चिठ्ठीने ज्यांच्या पॅनलचा सरपंच झाला, त्यांच्याविरोधी पॅनलला उपसरपंचपद असाही फॉम्युला ठरला असल्याचे यावेळी स्पष्ट केले. चिठ्ठीनंतर दोन्ही उमेदवारांची एकत्र गुलाल टाकून मिरवणूक आणि काळेश्वरी देवीचे दर्शन घेतले.
यानंतर गेले महिनाभर निवडणुकीच्या निमित्ताने धगधगणार गाव एकदम शांत झालं. पुढाऱ्यांनी निःश्वास टाकला. काही जण तर म्हणाले बरं झालं एकदाच मिटलं. चांगलं झालं. वादविवाद गावांत नकोच अशीच चर्चा सर्वत्र सुरु झाली. काळूबाईच्या नावाचा जयघोषच सुरु झाला. थेट सरपंचपदाचे उमदेवार मारूती चिकणे व साधू चिकणे यांच्या मतांची बरोबरी झाली. प्रत्येकाला 648 मते पडली अन् हाय व्होल्टेजचा ड्रामा शांत झाला.
कुसुंबीची निवडणूक धडा शिकवणारी
ग्रामपंचायत निवडणूक म्हटलं की गावात राम राहत नाही अस म्हटल जातं. आणि भाव-भावकी, गट-तट, रुसण- फुगणं, तोंड मुरडणं, एकमेकांबरोबर अचानक गट्टी फू, वाद विवाद, प्रचंड ताणतणाव यामध्ये सर्वसामान्य माणूस अक्षरशः भरडून जातो. अंतःकरणातून होरपळतो. नेमकं हेच प्रत्येक अटीतटीच्या निवडणुकीत होतं. येथेही असचं घडतं होतं. समान मतदान देवीचा कौल मानून गावकऱ्यांनी संघर्ष थांबवला. समन्वय राखून वेगळा आदर्श जिल्ह्यासमोर ठेवला. साधु बुबा व मारूती बापूंनी हातात हात घातला. गुलाल एकत्र घेतला. कुलषित झालेली मनं जोडण्यासाठी सर्वसामान्य मतदारांनी या निवडणुकीतून एकत्रित येण्याचा जणू धडाच शिकविला आहे.