आळंदी (एम. डी. पाखरे/ज्ञानेश्वर फड ) -संत ज्ञानेश्वर महाराज यांची संजीवन समाधी असलेले राज्यातील महत्त्वाचे तीर्थक्षेत्र आळंदीच्या वैभवात आणखी भर पडणार आहे. देवस्थानच्या 400 एकर जागेत आभासी वारी सोहळ्यासह, भक्त निवास, सांस्कृतीक केंद्र, पैसचा खांब, वारकरी विद्यार्थी निवास, हॉस्पिटल, वैद्यकीय महाविद्यालय, खुले प्रेक्षागृह, भक्तीपीठ अध्यासन उभारण्यात येणार आहेत. याकामासाठी 200 कोटींचा निधी शासनाकडून मिळणार आहे. दरम्यान, पहिल्या टप्प्यात भक्त निवास, वारकऱ्यांच्या राहुट्या उभारण्यासाठी ओटे आणि आभासी (व्हर्चुअल) वारीसाठी 25 कोटींचा निधी देण्यात येईल, अशी घोषणा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. ज्या भाविकांना वारी सोहळ्यात सहभागी होता येत नाही अशांना आळंदीतच संपूर्ण वारी सोहळा कसा असतो हे अनुभवता येणार आहे. एकूण 3 किमी हा पालखी मार्ग उभारण्यात येणार असून यात पालखी सोहळा, दिंडी, सर्व मुक्काम, गोल-उभे रिंगण, वाखरीचे रिंगण आदी सर्व सोहळा दाखवण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. संत ज्ञानेश्वर महाराज देवस्थानची चाकण रोडवर सुमारे 400 एकर जमीन आहे. यावर गायरान जमिनीचा शेरा देण्यात आला होता त्यामुळे या जागेच्या विकासावर मार्यादा आल्या होत्या; मात्र आता ही जागा देवस्थानला मिळाली आहे. त्यामुळे येथे शासनाकडून विकास कामे केली जाणार आहेत. या जागेवर वारकऱ्यांना काय काय सुविधा देण्यात येतील, पर्यटनाच्या दृष्टीने काय विकास करता येईल याबाबत आराखडा तयार करण्यात आला आहे.
पाच हजार भाविक क्षमतेचे भक्तनिवास
आळंदीला माऊलींच्या दर्शनासाठी वर्षभर भाविकांची वर्दळ असते. दुरून भाविक आलेले असतात. त्यांच्या निवासासाठी अल्पदरात 5 हजार भाविक क्षमतेचे वारकरी भक्त निवास उभारण्यात येणार आहे. वारीच्या काळात आलेल्या दिंड्यांना राहुट्या उभारून राहता येईल, 15 हजार भाविक राहू शकतील, भजन कीर्तन करता येईल, अशी सुसज्ज जागा तयार करण्यात येत आहे. त्याठिकाणी स्वच्छतागृहे, स्वयंपाकाकरिता सुविधा असणार आहेत. माऊलींनी नेवासा येथे ज्या खांबाजवळ बसून ज्ञानेश्वरी लिहिली त्याच खांबाची प्रतिकृती (पैसचा खांब) याठिकाणी उभारण्यात येणार आहे.
खुले प्रेक्षागृह उभारणार
वारकरी शिक्षण घेण्यासाठी आळंदीला आलेल्या विद्यार्थांसाठी व्याख्यान व प्रशिक्षण केंद्र, खुली नाट्यगृहे, वसतीगृह उभारण्यात येणार आहे. 15 हजार क्षमता असलेले भजन, कीर्तन कार्यक्रमासाठी खुले प्रेक्षागृह उभारण्यात येणार आहे. वारकरी साहित्य अभ्यासासाठी भक्तीपीठ अध्यासन केंद्रही उभारण्यात येणार आहे.
तीर्थक्षेत्र होणार पर्यटन केंद्र
आषाढी पायी वारी सोहळा आणि कार्तिकी एकादशी, संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यावेळी माऊलींच्या दर्शनासाठी आळंदीला लाखो भाविक येत असतात. तसेच वर्षभर भाविकांची माऊलींच्या दर्शनासाठी रिघ असतेच; मात्र आता नियोजित आराखड्यानुसार तीर्थक्षेत्राचा विकास झाल्यास आळंदीला येणाऱ्या भाविकांची संख्या वाढणार आहे. भाविकांना सुसज्ज अशा सोयी-सुविधांसह प्रतिकात्मक वारी सोहळा अनुभवता येईल. या उभारणीनंतर आळंदी हे पर्यटनाचे केंद्र होईल. त्यामुळे येथे आता रोजगार, आणि व्यवसायाच्या संधीदेखील वाढण्याची शक्यता आहे.
आभासी वारी सोहळ्यासह सर्व सोयी, सविधांचा प्रतिकात्मक आराखडा तयार करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्यात भक्त निवास, वारकऱ्यांच्या राहुट्या उभारण्यासाठी ओटे आणि आभासी वारीचे काम होणार आहे. या कामाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार असून त्यांची वेळ घेण्यासाठी पाठपुरावा सुरू आहे. लवकरच प्रत्यक्ष कामाला सुरुवात होईल.
– योगेश देसाई, प्रमुख विश्वस्त, आळंदी देवस्थान