नवी दिल्ली – भारतीय लेगस्पिनर युजवेंद्र चहलने त्याच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील सर्वात वाईट काळाबाबत भाष्य केलं आहे. ही वेळ इतकी वाईट होती कि यावेळी तो अक्षरशः बाथरूममध्ये जाऊन रडला होता. एका युट्युबरशी बोलताना चहलने याबाबत खुलासा केला आहे.
चहलने सांगितले की, यावेळी तो खूप निराशेत होता, पण पत्नी धनश्री वर्माच्या मदतीने तो निराशेवर मात करू शकला. UAE मध्ये 2021 च्या T20 वर्ल्ड कपसाठी चहल ऐवजी टीममध्ये वरूण चक्रवर्तीला प्राधान्य देण्यात आले होते. हा तोच काळ होता जेव्हा चहल स्वतःवर खूप नाराज होता.
चहलने सांगितले की 2021 च्या T20 विश्वचषकासाठी भारतीय संघात निवड न होणे हा त्याच्या कारकिर्दीचा सर्वात वाईट टप्पा होता.याचवेळेस तो खूप भावूक देखील झाला होता. यामुळे बाथरूममध्ये जाऊन तो अक्षरशः रडला होता. अशी माहिती चहलने एका युट्युब शो दरम्यान दिली. तेव्हा युजवेंद्र चहलची निवड का करण्यात आली नाही, यावर भारतीय संघावर बरीच टीका झाली होती. एका यूट्यूब चॅनलवर बोलताना चहलने त्याच्या वाईट काळाची आठवण करून दिली आणि म्हणाला, “जास्त नाही. पण बाथरूममध्ये जाऊन मी रडलो होतो.
धनश्री वर्माबद्दल चहल काय म्हणाला?
चहल म्हणाला, “2021 च्या टी-20 विश्वचषकासाठी माझी निवड झाली नाही तेव्हा मला खूप वाईट वाटले. तेव्हा मला दुबईत आयपीएल खेळायचे होते. त्यावेळी धनश्री माझ्यासोबत होती. दुसऱ्या दिवशी दुबईची फ्लाइट पकडायची होती. कोविडमुळे पुढे ढकलण्यात आलेले आयपीएल सामने खेळण्यासाठी आम्हाला जावे लागले.
तो पुढे म्हणाला, “आम्हाला आठवडाभर क्वारंटाईन राहावे लागले. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे धनश्री माझ्यासोबत होती. मी माझ्या रागावर नियंत्रण ठेवू शकलो. ती नसती तर कदाचित मला जास्त राग आला असता.