जळोची – तुम्ही पत्रकार हे… ‘दांडक दिलं, कॅमेरा दिला की काहीही विचारत बसता. जे मुद्द्याची असेल, माझ्याकडून काही माहिती हवी असेल तर याबाबत विचारणा केली तर ते ठीक आहे. ही कुठली पद्धत, हा असं म्हणाला तुमचं मत काय? मग अजित पवार असं म्हणालात तुमचं मत काय ? एवढेच धंदे आहेत काय तुम्हाला’, असा शब्दात विरोधी पक्षनेते अजित पवार पत्रकारांवर भडकले.
बारामती येथे नेहमीप्रमाणे आढावा बैठकांसाठी विरोधी पक्षनेते अजित पवार रविवारी (दि. २३) आले होते. यावेळी माध्यमांशी बोलताना त्यांनी पत्रकारांवर चांगलाच राग काढला. ते म्हणाले, बोलण्याच्या ओघांमध्ये काहीजण वेगळं बोलतात. त्याचं तुम्ही एवढे गांभीर्याने घेऊ नका. तुम्हाला हेडलाईन द्यायला काहीतरी लागतं. म्हणून ते अशा पद्धतीने तुम्हाला पुरवठा करतात. मग तुम्ही त्याबाबत सगळीकडे विचारता.
अरे बाबांनो आपल्या महाराष्ट्रामध्ये बेरोजगारीचा प्रश्न आहे. अवकाळी, गारपीट, महागाई असे अनेक प्रश्न आहेत. शेतकºयांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे. सरकारी खरेदी केंद्र बंद झाले आहेत. ते विचारायचे दिले सोडून आणि हे असे म्हणाले ते तसे म्हणाले. सत्ताधाºयांनी त्यांच्या पक्षांतर्गत काय चर्चा करावी हा त्यांचा प्रश्न आहे. त्यांचे मंत्री, पालकमंत्री काय बोलतात हा त्यांचा अधिकार आहे. तुम्ही पत्रकार हे दांडक दिलं, कॅमेरा दिला की काहीही विचारत बसता.
जे मुद्द्याची असेल, माझ्याकडून काही माहिती हवी असेल तर याबाबत विचारणा केली तर ते ठीक आहे. असे महाराष्ट्रात अनेक जण काही वक्तव्य करणार आणि तुम्ही मला त्याबाबत विचारणार तुमचं मत काय. मला त्याबाबत काय घेणं देणं आहे. त्यांचे मत त्यांनी व्यक्त केले त्याबाबत मी का टीका टिप्पणी करू, अशा शब्दात अजित पवार यांनी पत्रकारांना फटकारले.
मला कोणी चांगले म्हणत असतील तुमच्या पोटात का दुखतं…
मुंबई येथील महाविकास आघाडीच्या वज्रमुठ सभेसाठी पोलीस प्रशासनाने अद्याप परवानगी दिली नाही. नागपूर येथून येताना आमची उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा झाली आहे. या सभेच्या परवानगीसाठी मी स्वत: लक्ष घालतो असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. नागपूरच्या सभेला परवानगी देताना सुद्धा त्यांनी नाटके केली होती. इतकेच लोक हवेत तितकेच लोक हवेत असे आडवेढे घेतले होते.
लोकशाहीमध्ये विरोधी पक्षांना सभा घेण्याचा अधिकार आहे. संविधानाच्या चौकटीत आपली मतमतांतरे प्रत्येकाने व्यक्त करावीत. मला जर कोणी चांगले म्हणत असतील तर तुमच्या पोटात दुखायचे काय कारण? असा सवाल करत अजित पवार पुढे म्हणाले, प्रत्येकाने चांगले काम करावे. कोणी काय बोलावे हा त्यांचा अधिकार आहे.