मुंबई – एका सहकारी बॅंकेच्या 980 कोटी रूपयांच्या घोटाळा प्रकरणात शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसुळ यांना कोणताहीं अंतरिम दिलासा देण्यास मुंबई हायकोर्टाने नकार दिला आहे. ईडीने अडसूळ यांना समन्स जारी केले आहे त्याला आव्हान देणारा अर्ज त्यांनी दाखल केला आहे.
राजकीय कारणावरून हे समन्स जारी करण्यात आले आहे असा युक्तिवाद अडसुळ यांच्या वकिलांनी केला. अमरावतीतील भाजप खासदार नवनीत राणा यांच्या पतीच्या तक्रारीवरून ईडीने ही कारवाई केली आहे त्यामुळे ती केवळ राजकीय द्वेषापोटीचीच आहे असेहीं त्यांनी नमूद केले.
अडसुळ यांच्या याचिकेवरून कोर्टाने नवनीत राणा यांचा जातीचा दाखला रद्दबातल ठरवला आहे. त्या रागापोटी त्यांच्या विरोधात ही तक्रार करण्यात आली असल्याचेही अडसुळ यांच्या वकिलांनी नमूद केले. मुळात बॅंक घोटाळा प्रकरणात स्वत: अडसुळ यांनीच मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हा शाखेकडे पहिली तक्रार दाखल केली आहे असेही अडसुळ यांच्या वकिलांनी कोर्टाच्या निदर्शनाला आणून दिले.
तथापि अडसुळ यांच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादला ईडीच्या वकिलांनी जोरदार आक्षेप घेतला. या दोन्हीं युक्तिवादानंतर हायकोर्टाने स्पष्ट केले की, आत्ताच्या क्षणी याचिकाकर्ते अडसूळ यांना कोणताही अंतरीम दिलासा आम्ही देऊ शकत नाही.