मुंबई – प्रख्यात गीतकार जावेद अख्तर यांनी अभिनेत्री कंगना राणावत हिच्या विरोधात बदनामीचा खटला दाखल केला आहे. तथापि कंगनाने हा खटला अन्यत्र हलवण्याची मागणी केली आहे. तिच्या या मागणीला जावेद अख्तर यांनी तीव्र विरोध दर्शवला आहे.
केवळ खटल्याला विलंब व्हावा यासाठीच तिने ही खेळी चालवली आहे असे त्यांनी म्हटले आहे. ज्या कोर्टात हा खटला सरू आहे त्या कोर्टावर आपला विश्वास राहिलेला नाही असे कारण देत तिने हा खटला अन्यत्र वर्ग करण्याची मागणी केली आहे.
तथापि तिची ही मागणी खोडसाळ स्वरूपाची असून ती त्वरीत फेटाळली जावी अशी मागणी जावेद अख्तर यांनी आपल्या वकिलांमार्फत आज झालेल्या सुनावणीच्यावेळी केली. ही सुनावणी अंधेरीच्या मॅजिस्ट्रेट कोर्टात सुरू आहे.
जावेद अख्तर यांनी म्हटले आहे की, हा खटला दाखल होऊन सात महिने झाले आहेत. आता कंगनाला या प्रकरणात समन्स जारी करण्यात आल्यानंतर तिनेही मागणी केली आहे, त्यात केवळ सुनावणीला विलंब करणे हाच एकमेव हेतू आहे असेही त्यांनी म्हटले आहे.