वॉशिंग्टन : पृथ्वीवरील जीवसृष्टीचे अस्तित्व कधी संपेल याबाबत कोणताही अंदाज आता नसला तरी त्यासाठी तयारी मात्र शास्त्रज्ञांनी आतापासूनच सुरू केली आहे. प्रलय काळामध्ये पृथ्वीवरील प्रत्येक प्रकाराचा जीव जपण्यासाठी आता चंद्रावर एक भूमिगत बंकर उभारण्यात येणार असून या बंकरमध्ये हे जीवसृष्टीचे अंश जपून ठेवण्यात येणार आहेत.
प्रलयानंतर जर जीवसृष्टीचे परत पुनर्जीवन करायचे असेल तर काय करावे याबाबत शास्त्रज्ञाने विचार सुरू केला असून त्यामध्ये ताजी घडामोड म्हणून या चंद्रावरील भूमिगत बंकर कडे आता पाहिले जात आहे, शास्त्रज्ञांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, भूमिगत बंकर उभारण्यासाठी तब्बल 250 रॉकेट्स चंद्रावर पाठवावी लागणार आहेत.
चंद्रावरील हे भूमिगत बंकर सौर ऊर्जेवर कार्यरत राहणार आहे. बंकरमध्ये विविध प्रकारचे बियाणे आणि इतर हजारो प्राण्यांचे शुक्राणू जतन करून ठेवण्यात येणार आहेत. ही कल्पना प्रोफेसर जेकान कांगा यांनी विकसित केली असून ते अजूनही त्यावर अभ्यास करत आहेत. मंगळावरील वातावरण खूप थंड असल्यामुळे हे जीवसृष्टीचे सर्व अंश सुरक्षितपणे जपले जातील असा विश्वास कांगा यांना आहे. त्यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, या बंकरमध्ये मानवा शिवाय जगातील सदुसष्ट लाख प्राण्यांचे आणि जीवांचे अंश शुक्राणू आणि अंडाशय यांचे जतन केले जाणार आहे.
पृथ्वीवर अशा प्रकारची बियाणे बँक जर बांधण्यात आली तर प्रलयकालात तीसुद्धा नष्ट होण्याचा धोका असल्यानेच आता शास्त्रज्ञांनी चंद्राचा पर्याय स्वीकारला आहे. जीवसृष्टीच्या या अंशाचे जतन करण्यासाठी चंद्रावरील भूमी सर्व दृष्टीने आदर्श असल्यानेच शास्त्रज्ञ त्याठिकाणी बंकर उभारण्याचा विचार आता प्राधान्याने करताहेत. नजीकच्या कालावधीमध्ये या योजनेला मूर्त स्वरूप येण्याची शक्यता आहे.