सुपा – पारनेर तालुक्यातील भोयरे गांगर्डा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शैचालय जवळून जात असलेल्या विद्युत तारा लोंबत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवितास धोका निर्माण झाला आहे. वारंवार दुरुस्तीची मागणी करून देखील महावितरणकडून त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने पालकांकडून तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे.
सारोळा सोमवंशी येथील संदेश अनिल आढाव या अकरावीत शिकणाऱ्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा नुकताच विद्युत तारेवर पाय पडून मृत्यू झाला. यासही महावितरणचा ढिसाळ कारभार जबाबदार आहे. जून महिन्यात विजेच्या तारा लोंबकळत असून, त्याची दुरुस्ती करण्यात यावी, अशी मागणी करणारे रितसर पत्र ग्रामपंचायतीने महावितरणला दिले होते. मात्र महावितरणने या पत्राकडे दुर्लक्ष केल्याने संदेश आढाव या विद्यार्थ्यांचा जीव गेल्याचा आरोप ग्रामस्थांतून होत आहे.
भोयरे गांगर्डा येथे देखील विद्युत तारा शाळेच्या शौचालयाजवळून गेल्या आहेत. विद्यार्थ्यांचा याठिकाणी नेहमीच वावर असतो. सध्या या विद्युत तारा लोंबकळत आहेत. याची लाईनमनला वेळोवेळी कल्पना देऊन देखील त्याची दखल घेतली जात नाही. त्यामुळे एखादी दुर्घटना होण्याची वाट महावितरण पाहात आहेत का ? असा सवाल शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष राजेंद्र रसाळ यांनी केला आहे. याची तातडीने दखल घेऊन कारवाई करण्यात यावी व शाळा सुरू होण्यापूर्वी तारांची दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.