शेवगाव, (प्रतिनिधी) – कुसुमाग्रजांनी मराठी भाषा ही अलंकारीक भाषेपेक्षा ज्ञान भाषा कशी होईल, याकडे लक्ष दिले. त्याकरिता त्यांनी विज्ञानावर कविता केल्या. तसेच इंग्रजी साहित्य मराठीत रुपांतरित केले .ज्यामुळे मराठी वाचकांनाही इंग्रजी साहित्य समजण्यास मदत झाली.
मराठी भाषेला समृद्ध आणि संपन्न बनवण्याचे काम कुसुमाग्रजांनी तसेच संत-पंत आणि साहित्याने करून मराठीला अभिजात साहित्याचा दर्जा मिळवून देण्याचा प्रयत्न केल्याचे प्रतिपादन संत साहित्यिक, संशोधक प्रा.डॉ.अनिता आढाव यांनी केले.
येथील न्यू आर्ट्स महाविद्यालयाच्या मराठी विभागाद्वारे आयोजित मराठी राजभाषा गौरव दिन व गुणवंतांच्या सत्कार समारंभात बोलत होत्या. महाविद्यालयात मराठी राजभाषा गौरवदिन आणि कविवर्य कुसुमाग्रज जन्मदिनानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. इंग्रजी विभागप्रमुख डॉ. रवींद्र वैद्य अध्यक्षस्थानी होते.
हिंदी विभागप्रमुख डॉ.गोकुळ क्षीरसागर, डॉ.संदीप मिरे, डॉ. गहिनीनाथ शेळके, प्रा.अनिल काळे, प्रा.मोहन वेताळ, प्रा.राम कोरडे, प्रा. सोपान नवथर, प्रा.राहुल ताके, प्रा. मिनाक्षी चक्रे, चंद्रशेखर मुरदारे यांचेसह विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. काव्य वाचन व निबंध स्पर्धेत क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके वितरीत करण्यात आली.