पुणे – स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त “अमृत सरोवर योजना’ राबविली जात आहे. त्यासाठी जिल्ह्यातील 90 तलावांची निवड करण्यात आली आहे. त्यातील 25 तलावांच्या पुनरुज्जीवनाचे काम स्वातंत्र्यदिनापर्यंत पूर्ण होणार आहे. या तलावांवर स्वातंत्र्यदिनी गावातील स्वातंत्र्यसैनिक, ग्रामपंचायतीचे ज्येष्ठ सदस्य, पद्मश्री पुरस्कारप्राप्त व्यक्तींच्या हस्ते ध्वजारोहण केले जाणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.
केंद्र शासनाच्या “अमृत सरोवर योजने’च्या माध्यमातून पावसाचे पाणी भूगर्भात मुरवले जात आहे. त्यातून भूगर्भातील पाणीपातळी वाढवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. 15 ऑगस्टपर्यंत ही कामे पूर्ण करण्यात येणार आहेत. पावसाळ्यात नवीन तलावांची निर्मिती करणे शक्य नाही. त्यामुळे सध्या पुनरुज्जीवनाचा कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे, तर पुढील वर्षासाठी नवीन 75 तलावांची नावे निश्चित करण्यात आली आहेत.
जिल्ह्यातील काही गावांत अमृत सरोवरांची निर्मिती करता येत नसेल, त्या ठिकाणी उपलब्ध तलावातील गाळ काढणे, तलावाचे पुनरुज्जीवन करणे आदी कामे करून तलावातील पाणीसाठा वाढवण्याचे प्रयत्न केले जात आहेत. या कामासाठी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, पंधरावा वित्त आयोग, कृषी सिंचन योजना यांसह इतर योजनांचा निधी वापरला जात आहे.
48 ठिकाणी कामे सुरू
आजादी का अमृत महोत्सव अंतर्गत अमृत सरोवर योजना राबविली जात आहे. जिल्ह्यात 75 तलावांची निवड करण्यात येणार होती. मात्र, 90 तलावांची निवड करण्यात आली आहे. त्यातील 48 ठिकाणी कामाला सुरुवात झाली आहे, तर त्यातील 25 तलावांचे काम 15 ऑगस्टपर्यंत पूर्ण होणार आहे, असेही जिल्हा रोहयोच्या कार्यालयाकडून सांगण्यात आले.