पुणे – तळहात, तळपाय, पार्श्वभाग, तोंड व घशात फोड येणे, त्यात पाणी होऊन खाज सुटणे अशी लक्षणे असलेल्या “हॅंड, फूट अँड माऊथ’ या रोगाचा प्रादुर्भाव सध्या वेगाने होत असून, या आजाराच्या विळख्यात सर्वाधिक लहान मुले अडकली आहेत.
सुरुवातीला कांजण्या असतील, असा संशय यामध्ये पालकांना येतो; परंतु हा कांजण्याचा प्रकार नसून, एका विषाणूमुळे होणारा आजार असल्याचे बालरोग तज्ज्ञ सांगतात. याला “एचएफएमडी’ अर्थात “हॅंड फूट अँड माऊथ डिसीज’ असे म्हणतात.
हा संसर्गजन्य आजार असून, लहान मुलांमध्ये तो अत्यंत वेगाने पसरतो. शिंक, खोकल्याबरोबरच आजारी व्यक्तीचा रुमाल, टॉवेल, कपडे वापरल्याने तो वेगाने पसरतो. पाच वर्षांच्या आतील मुलांना याची लागण वेगाने होते आणि फोडांच्या स्वरूपात ती बाहेर पडते, असे निरीक्षण तज्ज्ञांनी नोंदवले आहे.
“एन्टरोव्हायरस’ या प्रकारच्या विषाणूंमुळे हा रोग होतो. याच वर्गातील “कॉक्सॅकी’, “इकोव्हायरस’ आणि “एन्टरोव्हायरस’ हेदेखील विषाणू लहान मुलांमध्ये आजार पसरवतात. “एचएफएमडी’चा संसर्ग झाल्यास विषाणू शरीरात गेल्यानंतर पाच ते सहा दिवसांत या आजाराची लक्षणे दिसू लागतात. ताप, सर्दी, खोकला ही प्राथमिक लक्षणे आहेतच, याशिवाय तोंडात फोड येणे, घसा दुखणे, पाणी गिळायला त्रास होणे, असे प्रकार यामध्ये दिसून येतात.
याचा संसर्ग झाल्यावर तळहात, तळपाय, तोंडात, पार्श्वभागावर जे फोड येतात; त्यामध्ये पाणी भरलेले असते आणि त्यामुळे प्रचंड खाज येते. ते खाजवल्याने अन्य ठिकाणी संसर्ग होण्याचा धोका असतो. हे फोड एका दिवसातच मोठ्या प्रमाणात वाढतात.
काही दिवसांनी हे फोड कोरडे होतात आणि जातात. याचे डाग पडत नाहीत, मात्र खाजवल्यास अन्य ठिकाणी विषाणूंचा संसर्ग होऊन पू होऊ शकतो. काही वेळेला याचा संसर्ग अधिक तीव्र असल्यास लहान मुलांच्या मेंदूच्या आवरणाला सूजही येते, असे बालरोगतज्ज्ञांनी सांगितले.
अद्याप लस, औषध उपलब्ध नाही
या विषाणूंच्या बाधेवर अद्याप एकही औषध बाजारात उपलब्ध नाही. त्यामुळे मुलांमधील लक्षणांच्या आधारे आणि आजाराच्या तीव्रतेनुसार औषधोपचार केले जातात. यामध्ये वेगवेगळे लक्षणे असल्याने त्या त्या आजारावरील औषधे व फोडांना लावण्यासाठी मलम दिले जातात. हा आजार बरा होणारा असला तरी तो जोपर्यंत बरा होत नाही, तोपर्यंत मुलांच्या खाण्या-पिण्यावर परिणाम होतो. पर्यायाने त्यांचे वजन घटणे असे प्रकार होतात. मुलांना भूक असते; परंतु खाता येत नसल्याने त्यांची चिडचीड होते. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीवरही परिणाम होताना दिसतो. त्यामुळे तिखट नसलेले, सात्विक पदार्थ मुलांना खायला देणे योग्य.
अशी आहेत लक्षणे…
हाता-पायांचे तळवे, पार्श्वभाग, तोंडात पुरळ उठणे
तीव्र ताप येणे
घशामधील संसर्ग
नाक गळणे (सर्दी)
थकवा जाणवणे