अमरावती – लोकसभा निवडणुकीच्या काळात आचारसंहिता भंग केल्याप्रकरणी गृहमंत्री अनिल देशमुख आणि खासदार नवनीत कौर राणा यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. अमरावतीच्या जिल्हा सत्र न्यायालयाने अनिल देशमुखांसह 17 जणांची निर्दोष मुक्तता केली आहे.
लोकसभा निवडणुकीत नवनीत राणा यांना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीकडून पाठिंबा देण्यात आला होता. लोकसभा निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरतेवेळी नवनीत राणा यांनी भव्य रॅली काढली होती. या रॅलीत गृहमंत्री अनिल देशमुख, डॉ. राजेंद्र गवई, रावसाहेब शेखावत, बाबा राठोड, हर्षवर्धन देशमुख, गणेश खारकर, संगीता ठाकरे, अभिनंदन पेंढारी, पुष्पाताई बोंडे, सुनील वऱ्हाडे, रामेश्वर अभ्यंकर, गणेश राय, जितू दुधाने, ज्योती सैरासे, प्रशांत कांबळे, रसीद खा असे एकूण 17 जण उपस्थित होते.
या पार्श्वभूमीवर आदर्श आचारसंहितेचा भंग केल्याप्रकरणी निवडणूक नियंत्रण कक्षाचे फ्लाईंग स्कॉड अधिकारी जितेंद्र देशमुख यांनी गाडगे नगर पोलीस स्टेशनध्ये तक्रार दाखल केली होती. यानुसार नवनीत कौर राणा, अनिल देशमुख यांच्यासह 17 जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता.
याप्रकरणी जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश एफ. ए. देशपांडे यांनी सर्व आरोपींनी निर्दोष मुक्त केले आहे.
फिर्यादी पक्षाने या प्रकरणी थेट न्यायालयात धाव न घेता पोलिसांत तक्रार दाखल केली होती. त्यामुळे फिर्यादी पक्षाने केलेली याचिका कोर्टाने रद्दबातल आहे. त्यामुळे आम्ही सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता करत आहोत, असे न्यायालयाने म्हटले आहे.