नवी दिल्ली : राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीचा एनआरसी कार्यक्रम लवकरच संपूर्ण देशात राबविला जाईल आणि देशातील नागरिकांची नोंदणी केली जाईल, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी स्पष्ट केले. पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीची मागणी होत असून तेथील मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घ्यायला जात असतानाच अमित शहा यांनी संपूर्ण देशात हा कार्यक्रम घेण्याचे जाहीर करून विरोधकांवर निशाणा साधला आहे.
एका माध्यम संस्थेने आयोजीत केलेल्या कार्यक्रमात बोलताना अमित शहा यांनी ही घोषणा केली. ते म्हणाले, भारताचा नागरिक अमेरिका, इंग्लंड, रशिया देशांमध्ये जाऊन बेकायदा राहू शकतो का, याचे उत्तर अर्थात नाही असेच आहे. मग इतर देशाचे नागरिक भारतात कोणत्याही अधिकृत कागदपत्रांशिवाय बेकायदा कसे काय राहू शकतात. त्यामुळेच राष्ट्रीय नागरिकत्व नोंदणीचा कार्यक्रम संपूर्ण देशात राबविला जाणार आहे.
तसेच यावेळी त्यांनी जम्मू-काश्मिरला विशेष राज्याचा दर्जा देणे आणि कलम 370 रद्द करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचेही समर्थन केले. या निर्णयावर जगातील देशांनी भारताला पाठिंबा दिला आहे, असेही त्यांनी सांगितले. पुढील लोकसभा निवडणुकीपर्यंत देशातील नक्षलवाद संपविण्यात येईल, असे सांगून ते म्हणाले, मोदी सरकारच्या पहिल्या टर्ममध्ये नक्षलवादी हल्ल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.