उद्धव ठाकरे : स्वांतत्र्यवीर सावरकरांना “भारतरत्न’ने सन्मानित केले पाहिजे
मुंबई : स्वातंत्र्यवीर सावरकर देशाचे पहिले पंतप्रधान झाले असते तर पाकिस्तानची निर्मितीच झाली नसती, असे वक्तव्य शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केले आहे. तसेच स्वांतत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित केले पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.
लेखक विक्रम संपथ यांच्या “सावरकर इकोज फ्रॉम फर्गटन पास्ट’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात उद्धव ठाकरे बोलत होते. ठाकरे म्हणाले, स्वातंत्र्यवीर सावरकर भारताचे पंतप्रधान असते तर पाकिस्तानची निर्मिती झाली नसती. आमचं सरकार हिंदुत्ववादी सरकार आहे. त्यामुळे मी सावरकरांना भारतरत्न देण्याची मागणी करत आहे. आपल्याला रत्नाची पारख नसेल तर जागतिक पातळीवर आपली नाचक्की होते, असे त्यांनी स्पष्ट केले.
महात्मा गांधी आणि स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडीत जवाहरलाल नेहरू यांनी केलेले काम मी नाकारत नाही. मात्र देशात केवळ दोनच घराणी नाहीत. पंडीत नेहरु यांना वीर बोलण्यात काहीच वाटले नसते, जर ते काही मिनिट जरी तुरुंगात गेले असते. स्वातंत्र्यवीर सावरकरांनी 14 वर्षे तुरुंगवास भोगला. मात्र, सावरकरांनी ज्या तुरुंगात तुरुंगवास भोगावा लागला, तो आता पिकनिक स्पॉट झाला असल्याची खदखदही त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी त्यांनी राहुल गांधींवरही निशाणा साधला. लोकसभा निवडणूक प्रचारादरम्यान राहुल गांधींनी सावरकरांना पळकुटे म्हटले होते. त्यावेळी राहुल गांधींना नालायक बोलणारा मी पहिला होता, तसेच त्याला जोडे मारायला सांगणाराही मीच होतो. राहुल गांधी कधीच पंतप्रधान बनू शकणार नाहीत. एखाद्या देशाचा पंतप्रधान होण्यासाठी त्या देशीची माहिती असणेही आवश्यक असते, असा टोलाही त्यांनी लगाविला.