तृणमूल कॉंग्रेसने दिले जाहीर आव्हान
कोलकाता – स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यात पोचवण्यासाठी पश्चिम बंगाल सरकार विशेष रेल्वे गाड्यांना अनुमती देत नसल्याचा आरोप गृहमंत्री अमित शहा यांनी केला होता. पण तेथील तृणमूल कॉंग्रेस पक्षाने हा आरोप साफ धुडकाऊन लावला आहे. हा सरळसरळ खोटारडेपणा आहे. अमित शहा यांनी हा आरोप सिद्ध करावा अन्यथा पश्चिम बंगाल सरकारची माफी मागावी अशी मागणी तृणमूल कॉंग्रेसचे नेते व मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी यांनी केली आहे.
त्यांनी या संबंधात म्हटले आहे की संपुर्ण देशभर स्थलांतरित मजुरांचा प्रश्न अत्यंत भीषण अवस्थेत गेलेला असताना अमित शहा मूग गिळून गप्प बसले होते. त्यांना आपले गृहमंत्री म्हणून कोणतेच कर्तव्य बजावता आलेले नाही. आता ते पश्चिम बंगाल सरकारविषयी दिशाभुल करणारी माहिती पसरवत आहेत. अमित शहा यांनी हा आरोप पुराव्यानिशी सिद्ध करावा किंवा माफी मागावी अशी जाहीर मागणी त्यांनी ट्विटरवर केली आहे.
अमित शहा यांनी पश्चिम बंगाल सरकारला पत्र पाठवून आपले सरकार श्रमिक स्पेशल रेल्वे गाड्या सोडण्यास विरोध करीत आहे असा आरोप केला होता. त्याच्या बातम्या सगळीकडे पसरवण्यात आल्या पण हा आरोप साफ खोटा आहे असे तृणमूल कॉंग्रेस पक्षाने नमूद करीत शहांनाच आरोप सिद्ध करण्याचे आव्हान दिल्यानंतर आता त्यांची भूमिका काय असेल याची उत्सुकता निर्माण झाली आहे.