अमरावती : लोकसभा निवडणुकीत अमरावतीमध्ये भाजप उमेदवार नवनीत राणा यांचा पराभव झाला होता. अमरावतीमध्ये यंदाच्या निवडणुकीमध्ये चौरंगी लढत झाली होती. या ठिकाणी काँग्रेसकडून बळवंत वानखेडे, भाजपकडून नवनीत राणा, बच्चू कडू यांच्या प्रहारकडून दिनेश बुब आणि रिपब्लिक सेनेकडून आनंदराज आंबेडकर यांना उमेदवारी देण्यात आली होती. या निवडणुकीत काँग्रेसच्या बळवंत वानखेडे यांचा 19,731 मतांनी विजय झाला. बळवंत वानखेडे यांना 5,26,271 तर नवनीत राणा यांनी 5,06,540 मतं मिळाली. बच्चू कडू यांच्या प्रहारचे उमेदवार दिनेश बुब यांनी 85,300 आणि आनंदराज आंबेडकर यांनी 18,793 मतं घेतली.
रवी राणा यांचा मोठा गौप्यस्फोट
नवनीत राणा यांच्या पराभवानंतर त्यांचे पती आणि आमदार रवी राणा यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. अमरावती जिल्ह्यात शरद पवार, उद्धव ठाकरे आणि राहुल गांधी यांच्यासारख्या दिग्गजांच्या सभा झाल्या. बच्चू कडू तोडीबाज आमदार असून त्यांना मातोश्रीवरून रसद पोहोचवण्यात आली, असा गंभीर आरोप रवी राणा यांनी यावेळी केला. तसेच नवनीत राणा या लवकरच जनतेच्या सेवेत दाखल होतील अशी आशादेखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.
रवी राणांची बच्चू कडूंवर टीका
अचलपूरच्या आमदारांना रसद पोहोचवण्यात आली. त्यांचं नावच तोडीबाज, वसुलीबाज आणि सुपारी घ्यायचं काम करतात. मातोश्रीवरून रसद घेणे, अनेक नेत्यांकडून वसूल करणे. नवनीत राणांना पाडण्यासाठी उमेदवार उभा करणे, या रणनीती आखण्यात आल्या. त्यांच्या मतदारसंघात त्यांचं डिपॉझिट जप्त होणार आहे, अशी टीका रवी राणांनी बच्चू कडूंवर केली आहे.