अमेठी – २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत पराभव झाल्यानंतर राहुल गांधी यांनी अमेठीकडे पाठच केली असल्याचे सूचित होत असले तरी येथील कॉंग्रेसचे कार्यकर्ते आणि नेते अजुनही राहुल अमेठी येथूनही रिंगणात उतरतील याबाबत आशावादी आहेत. कॉंग्रेसनेही अद्याप अमेठी आणि रायबरेली या उत्तर प्रदेशातील दोन जागांवरचे उमेदवार जाहीर केले नसल्यामुळे कार्यकर्तांचा हा आशावाद कदाचित चुकीचा नसेल असे मानण्यास वाव आहे.
मागच्या वेळी केरळमधील वायनाड येथून राहुल लोकसभेत दाखल झाले. केरळची ही जागा कॉंग्रेससाठी सगळ्यांत सेफ असल्याचे मानले जाते. त्यामुळे राहुल यांनी यंदाही सहकारी डाव्या पक्षांची नाराजी पत्करत वायनाडमधूनच रिंगणात उतरणे पसंत केले आहे. तथापि, हे सुरक्षित मतदारसंघ म्हणून आहे की रणनीतीचा भाग म्हणून आहे याबाबतही तर्क लढवले जात आहेत.
कॉंग्रेसचे अमेठीचे जिल्हाध्यक्ष प्रदीप सिंघल यांच्या म्हणण्यानुसार ते राहुल यांच्याबाबत अजुनही आशावादी आहेत. किंबहुना राहुलच येथून निवडणूक लढवणार असल्याचे तेथील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी गृहीत धरले आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार वायनाडचे मतदान एकदा झाले की याबाबतचा निर्णय घेतला जाईल.
वायनाडमध्ये २६ एप्रिल रोजी मतदान आहे तर अमेठीत २० मे रोजी मतदान होईल. दरम्यान, कॉंग्रेसने किंबहुना गांधी घराण्याने अमेठीला काय दिले या मुद्द्याचा प्रतिवाद करण्यासाठी गांधी घराण्याने काय काय केले याची आठवण करून देण्याचे अभियान पक्षाकडून राबवले जाण्याची शक्यता आहे.