अमेरिकेचा निर्णय दुर्देवी असल्याची भारताची प्रतिक्रीया
नवी दिल्ली – अमेरिकेने भारताला दिलेला व्यापार प्राधान्य दर्जा काढून घेतला आहे. त्यामुळे आता द्विपक्षीय व्यापारात भारताला अमेरिकडून मिळणाऱ्या सवलती बंद होणार आहेत. त्याचा भारताच्या आर्थिक स्थितीवरही भविष्यात विपरीत परिणाम होऊ शकतो. या पार्श्वभूमीवर अमेरिकाचा हा निर्णय दुर्देवी आहे अशी प्रतिक्रीया भारताने दिली आहे. द्विपक्षीय व्यापारात आता आम्ही आमचे राष्ट्रहित जोपासणार आहोत आमच्या जनतेलाही जीवनमानात सुधारणा करण्याची आकांक्षा आहे त्यांचे हितही आम्हाला जपावे लागेल अशी भूमिका भारताने मांडली आहे.
अमेरिकेने भारताचा हा दर्जा काढल्यानंतर भारतातर्फे एक निवेदन प्रसिद्धीला देण्यात आले आहे. त्यात भारताने म्हटले आहे की या विषयावर मध्यममार्गी तोडगा काढण्याचा प्रस्ताव आम्ही अमेरिकेला दिला होता. पण तो त्यांनी मान्य केला नाहीं. अमेरिकेने विकसनशील देशांच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी त्या देशांच्या अनेक वस्तुंच्या करमुक्त आयातीला अनुमती दिली होती. व्यापार प्राधान्य दर्जानुसार भारतालाही या सवलती मिळत होत्या. पण आता मात्र भारतीय मालाला अमेरिकेत करमुक्ती मिळणार नाही. तेथे भारतीय मालावर मोठ्या प्रमाणावर कर लागू केला जाणार आहे त्याचा निर्यातीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
या संबंधात अमेरिकेचे अध्यक्ष ट्रम्प यांनी म्हटले आहे की, भारताने व्यापाराच्या बाबतीत आम्हालाही योग्य ती करसवलत द्यायला हवी होती. निदान आमच्या बरोबरीने त्यांनीही व्यापारविषयक सवलती आमच्या मालासाठी लागू करायला हव्या होत्या पण त्यांनी त्या केल्या नाहीत त्यामुळे आम्हाला हा निर्णय घ्यावा लागला. भारताला हा दर्जा असल्याने भारताचा सन 2017 मध्ये सुमारे 5.7 अब्ज डॉलर्सचा माल करमुक्त पद्धतीने अमेरिकेत आयात केला गेला पण आता मात्र आयात भारतीय मालावर तेथे मोठ्या प्रमाणावर कर लागू केले जाणार आहेत. त्यामुळे अमेरिकेन बाजारपेठेमध्ये आपला माल निर्यात करणे भारतासाठी जड जाणार आहे.