तालुक्यातील रुग्णांची गैरसोय : दुरुस्तीच्या नावाखाली प्रशासनाचे दुर्लक्ष
भोर – भोर तालुका पंचायत समितीच्या आंबवडे प्राथमिक आरोग्य केंद्राची ऍम्ब्युलन्स गेल्या वर्षभरापासून नादुरुस्त असल्याने आंबवडे खोऱ्यातील रुग्णांची गैरसोय होत आहेण अतिदुर्गम डोंगरी भागातील रुग्णांना आरोग्य सेवा मिळत नसल्याने ही रुग्णवाहिका तातडीने पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी आंबवडे खोऱ्यातील नागरिक करीत आहेत.
भोर तालुका पंचायत समितीच्या आंबवडे प्राथमिक आरोग्य केंद्राची ऍम्ब्युलन्स गेल्या वर्षभरापासून कोरेगाव पार्क आरोग्य केंद्रात दुरुस्तीसाठी पडून आहे. आंबवडे खोऱ्यात रात्रीच्या वेळी डिलिव्हरी पेशंट आरोग्य केंद्रात आहे. शस्त्रक्रिया कॅम्पसाठी रुग्ण आणणे, त्यांनी पुन्हा घरी पोहोचवाणे, यासाठी ऍम्ब्युलन्स आवाश्यक असते. सध्या या भागात डेंग्यु, चिकुनगुनिया, हिवताप यांसारख्या साथीच्या आजाराच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून, त्यांना वेळेत उपचार मिळत नसल्याने त्यांचे आरोग्य धोक्यात येत आहे.
कोरेगाव पार्क आरोग्य केंद्रात दुरुस्तीच्या नावाखाली पडून
सध्या भात कापणीची कामे सुरू असून, शेतकरी वर्ग कामात व्यस्त असताना एखाद्यास सर्पदंश झाल्यास व अशा रुग्णास आरोग्य केंद्रात आणले तर गंभिर स्थित त्याला पुढील उपचारासाठी भोरच्या उपजिल्हा रुग्णालयापर्यंत पुढील उपचारासाठी वेळेत वाहन उपलब्ध होत नसल्याने रुग्ण दगावण्याची शक्यता वाढते, तर गुंतागुंतीच्या डिलिव्हरी असल्यास किंवा रुग्ण महिला सिरिअस झाल्यास आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्यांना समस्येला सामोरे जावे लागत आहे. ऍम्ब्युलन्स आरोग्य केंद्रात बंद आवस्थेत पडून असून, तिची संबंधितांनी तातडीने दुरुस्ती करून रुग्णांना ती उपलब्ध करून द्यावी अशी मागणी होत आहे.
आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका 15 वर्षांपेक्षा अधिक जुन्या
भोर तालुका पंचायत समितीच्या आरोग्य विभागाच्या अधिपत्याखाली भोंगवाली, नेरे, जोगवडी, आंबवडे, हिर्डोशी आणि नसरापूर ही सहा प्राथमिक आरोग्य केंद्र असून, या आरोग्य केंद्रातील रुग्णवाहिका 15 वर्षांपेक्षा अधिक जुन्या झाल्या असून रुग्णसेवेसाठी निरुपयोगी ठरत आहेत.
दुर्गम भाग रामभरोसे –
भोर तालुक्यातील अनेक गावे ही दुर्गम आहेत. यात सर्वसामान्यांना आरोग्य सेवा देण्याच्या नावाखाली छळवणूकच सुरू केल्याचा प्रकार आंबवडे केंद्राची ऍम्ब्युलन्स बंद पडल्यानंतरच्या प्रकारानंतर चव्हाट्यावर आला आहे. त्यामुळे नागरिकांना दर्जेदार आरोग्यसेवेचा लाभ कधी मिळणार, असा संतप्त सवाल नागरिकांतून उमटत आहे. आंबवाडे केंद्राची ऍम्ब्युलन्स बंद पडली असताना याकडे लक्ष देण्यासाठी अधिकाऱ्यांना फुरसत मिळत नसल्यामुळे कार्यक्षेत्रातील गावांतून संताप व्यक्त होत आहे.