सातारा – सातारा शहराची लाइफ लाइन असणारा कास तलाव परिसर वृक्षारोपणाअभावी उजाड होण्याच्या मार्गावर आहे. कास तलाव भिंत मार्गावर पहिल्या टप्प्यात तीन हजार झाडांचे होणारे वृक्षारोपण सातारा पालिकेने गुंडाळल्याची चर्चा सुरू झाली आहे. ज्या वृक्ष समितीने रोप खरेदीचा ठराव द्यायचा आहे त्याच समितीची पुनर्रचना करण्याची इच्छाशक्ती नसल्याने कास परिसरात वृक्षारोपणाचा विषय अधांतरी लटकला आहे.
टेंडर, टक्केवारी आणि भूमीपूजनाचे नारळ फोडणे इ. कामांची इतिकर्तव्यता पार पाडल्यावर विकास कामांची जंत्री जाहीरनाम्यात जोडायला नगरसेवक मोकळे. मात्र, गांभीर्याने शहराच्या विकासाचे कोणते निर्णय घ्यावेत याचा द्रष्टेपणा सत्ताधारी नगरसेवकांमध्ये नाही. कास धरण उंचीच्या प्रकल्पाचा सातारा विकास आघाडीने प्रचंड गाजावाजा केला. मात्र, ज्या 3553 झाडांची या कामानिमित्ताने कत्तल झाली. त्याची पुनर्लागवड करण्याचे औदार्य अजूनही पालिकेने दाखवले नाही.
पंधरा महिन्यांपूर्वी कास धरणाची भिंत वाढवण्याच्या कामाला सुरुवात झाली होती. धरणाकडून कासच्या जुन्या सांडव्याकडे जाणाऱ्या मार्गावरील “अ’ वर्ग प्रजातीतील झाडे तोडण्यात आली होती. राष्ट्रीय हरीत लवादाच्या सूचनेनुसार तोड झालेल्या झाडांच्या पाच पटीने संबंधित यंत्रणेने नव्या रोपांची लागवड करायची आहे. केवळ लागवड करायचीच नाही तर त्या झाडांची सलग तीन वर्ष जबाबदारी घेऊन 95 टक्के लागवड कार्यक्रम यशस्वी करायचा आहे.
मात्र वृक्षारोपणाच्या मुद्द्यावर शासकीय पातळीवर प्रचंड अनास्था आहे. अमृत योजनेत सातारा शहरात प्रत्यक्षात किती झाडांची लागवड केली याचा अहवाल पटलांवर ठेवण्यात आला नाही. गेल्या सहा महिन्यापासून समिती सदस्यांची मुदत संपल्याने बैठकच झालेली नाही. ज्या समितीने वृक्ष खरेदीची शिफारस करायची तीच मुदतबाह्य झाल्याने वृक्ष विभागाचा सावळा गोंधळ सुरूच
आहे.
वृक्ष विभागाची जबाबदारी उपमुख्याधिकारी संचित धुमाळ यांच्याकडे देण्यात आली आहे. कामात फार प्रशासकीय उत्साह दाखवायचा नाही आणि राजकीय शिफारशीच्या फायली फार न अडविता निमूटपणे त्यावर स्वाक्षरी करायची, या निमित्ताने राज्य संवर्गातील अधिकाऱ्यांची अडवणूक केली जात आहे. वृक्ष खरेदीच्या प्रस्तावाचे गांभीर्य मुख्याधिकारी शंकर गोरे यांनासुध्दा ठाऊक आहे. तसा प्रस्ताव त्यांच्या टेबलावरसुध्दा आहे, मात्र राजकीय व प्रशासकीय निष्क्रियतेमुळे खरेदी होणारी नवीन रोपे दापोलीच्या बाळासाहेब सावंत कृषी विद्यापीठातच अद्याप मुक्कामाला आहेत.