नवी दिल्ली – संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेल्या पश्चिम बंगाल निवडणुकीत भाजपच्या वाढत्या वर्चस्वाला ब्रेक लावत तृणमूल काँग्रेस पक्षाने ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वात आघाडी घेतली. बंगाल विधानसभा निवडणुकीच्या निकालात तृणमूल काँग्रेस आघाडीवर आहे. या निवडणुकीत अनेक राजकीय नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. तर अनेकांनी निकालावर भविष्यवाणी केली होती. राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी तर भविष्यवाणी खोटी ठरली तर राजकारणातून संन्यास घेईल असं म्हटलं होतं. त्यांची भविष्यवाणी खरी ठरली. तरी त्यांनी राजकारणाला रामराम ठोकण्याचा निर्णय घेतला आहे.
तृणमूल काँग्रेसच्या पश्चिम बंगालमधील विजयात मोलाचा वाटा असणारे ममता बॅनर्जींचे राजकीय सल्लागार आणि राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी या विजयानंतर राजकीय रणनीतीकार म्हणून आपण निवृत्ती घेत असल्याचं म्हटलं आहे. त्यांनी ही घोषणा एनडीटीव्हीशी बोलताना केली आहे.
बंगालमध्ये भाजप दोन अंकी आकडा पार करु शकणार नाही, असे भाकीत प्रशांत किशोर यांनी केले होते. जर दोन अंकी आकडा भाजपने ओलांडला तर आपण संन्यास घेऊ, असे त्यांनी म्हटले होते. पण भाकीत खरे ठरल्यानंतरही ते संन्यास घेत असल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.
प्रशांत किशोर म्हणाले की, आपल्याला संन्यास घ्यायचा होता, त्यासाठी योग्य संधीची वाट पाहत होतो. पश्चिम बंगालच्या निमित्ताने ही संधी मिळाल्याचे ते म्हणाले. इंडियन पॉलिटिकल अॅक्शन कमिटीमधून (I-PAC) आपण बाहेर पडत असल्याचे प्रशांत किशोर यांनी स्पष्ट केले आहे. याची सुरुवात प्रशांत किशोर यांनीच केली होती. तिथे अनेक हुशार लोक असून ते योगदान देतील, पण मी संन्यास घेत असल्याचे त्यांनी सांगितले आहे.