नगर -करोनाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेल्या स्थितीने सर्वांच्याच जगण्याची अडचण निर्माण झाली आहे. त्यात आपल्या शाळेत शिक्षण घेणाऱ्या अनेक विद्यार्थ्यांच्या पालकांची रोजीरोटीच बंद पडली आहे. अशावेळी शैक्षणिक कार्यासोबत सामाजिक दायित्व देखील आता जपावे लागेल, अशी भूमिका सविता रमेश फिरोदिया प्रशालेच्या मुख्याध्यापिका योगिता गांधी यांनी व्यक्त केली.
सविता रमेश फिरोदिया प्रशालेच्या मुख्याध्यापिका गांधी यांच्या पुढाकारातून सर्व शिक्षकांनी काही रक्कम जमा केली. त्यातून त्यांनी जीवनावश्यक वस्तू आणल्या. त्याचे कीट तयार करुन गरजू पालकांना आज वाटप करण्यास प्रारंभ केला. त्यावेळी त्या बोलत होत्या.
एक माणुकीच्या भावनेतून केलेल्या उपक्रमाचे पालकांमधून कौतुक होत आहे. या किटमध्ये गहू व तांदळचाही समावेश आहे. पालकांना फोन करुन शासनाच्या नियमांचे पालन करुन टप्याटप्प्याने हे वाटप करण्यात आले. संस्थेचे अध्यक्ष शांतीलाल गुंदेचा, उपाध्यक्ष दशरथ खोसे, सचिव र. धों. कासवा, सहसचिव राजेश झालानी, विश्वस्त ऍड. विजयकुमार मुनोत यांनी या उपक्रमास पाठबळ दिले.
लॉकडाऊनमुळे शाळाही बंद आहेत.
अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, म्हणून संस्थेच्या सविता रमेश फिरोदिया प्रशालेच्यावतीने विद्यार्थ्यांना ऑनलाईन स्टडी फ्रॉम होमउपक्रम राबवून विद्यार्थ्यांचा अभ्यास सुरु आहे. शासनाच्या पोषण आहार योजनेंतर्गत विद्यार्थ्यांच्या पालकांना तांदळाचे वाटप करण्यात आले आहे. दरवर्षी गरीब विद्यार्थ्यांच्या शाळेच्यावतीने गणवेश, शालेय साहित्य, प्रोत्साहनपर बक्षिसेही देण्यात येत असतात, अशी माहिती मुख्याध्यापिका गांधी यानीं दिली.