संगमनेर – तळेगाव व परिसरातील 21 गावांचा पाणी प्रश्न कायमस्वरुपी सोडविण्यासाठी या योजनेला निळवंडे धरणातून थेट पाणी पुरवठा करण्यास शासनाने मंजुरी द्यावी, अशी मागणी 17 गावांच्या ग्रामपंचायतींनी ठराव करून महसूल तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली आहे.
मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांची 17 गावांतील ग्रामपंचायत पदाधिकारी आणि ग्रामस्थांनी भेट घेऊन या मागणीचे निवेदन सादर केले आहे. या गावांना भेडसावत असलेली पाणी टंचाई, पाणी पुरवठा योजनेकडे थकीत असलेले वीज बिल आणि ग्रामपंचायतींनी यापूर्वी या मागणीसाठी केलेल्या पाठपुराव्याचे कागदपत्र, पालकमंत्र्यांना पुन्हा नव्याने केलेले ठरावासह सुपूर्त केले. वर्षानुवर्षे पाण्यापासून वंचित राहिलेल्या गावांना कायमस्वरुपी पाणी मिळावे, या उद्देशाने सर्व गावांनी एकत्रित येऊन केलेल्या मागणीला पुन्हा एकदा महत्व प्राप्त झाले आहे.
तळेगाव आणि पंचक्रोशीतील 21 गावे गेली अनेक वर्षे पाण्यापासून वंचित होती. या गावांकरिता प्रवरा नदी हा पाण्याचा उद्भव मानून या तळेगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजना कार्यान्वित करण्यात आली. या योजनेमुळे गावांना दिलासा मिळाला असला तरी, योजनेपुढे थकित वीज बिलाअभावी निर्माण होत असलेल्या समस्यांमुळे ही योजना यशस्वीपणे चालू शकत नसल्याची बाब या शिष्टमंडळाने विखे पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली आहे.
या योजनेकडे 9 कोटी 72 लाख रुपयांचे वीज बिल सध्या योजनेकडे थकीत असल्याने वीजप्रवाह खंडीत करण्याच्या नोटिसा सातत्याने देण्यात येतात. पाण्याचा उद्भव प्रवरा नदीपात्रातून असला तरी, निंबाळे आणि वडगावपान या दोन ठिकाणांहून पाणी पंपिंग करून उचलून न्यावे लागत असल्याने यासाठी लागणारा वीज खर्च योजनेवर पडत आहे. पाण्याचा उद्भव ते प्रत्यक्ष तलाव यातील अंतरही मोठे असल्याने बहुतेक वेळा पाईपलाईनमध्ये होणाऱ्या बिघाड दुरुस्तीचा खर्चही योजनेवर पडत आहे.
या मागणीसाठी ग्रामस्थांनी वेळोवेळी आंदोलने केली आहेत. पिण्याच्या पाण्याची गंभीर समस्या लक्षात घेऊन महायुती सरकारने खास बाब म्हणून या प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेस थेट निळवंडे धरणातून पाईपलाईनद्वारे पाण्याची उपलब्धता करून दिल्यास दुष्काळी गावातील गावांना दिलासा मिळेल.
शरद गोर्डे, निळवंडे-भोजापूर पाटपाणी समिती.