शिर्डी – श्री साईबाबा संस्थानमधील 598 कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संदर्भातील उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सर्व निर्णयाबाबत शासनाच्या विधी व न्याय विभाग आणि संस्थान स्तरावर तातडीने कार्यवाही सुरू करण्याबाबत निर्णय घेण्यात आल्याची माहिती महसूल, पशुसंवर्धन व दूग्ध व्यवसाय विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.
शिर्डी संस्थानमधील 598 कंत्राटी कर्मचारी संस्थानचा 2004 चा नवा कायदा अस्तित्वात येण्यापूर्वीपासून कार्यरत आहेत. मात्र, अद्याप या कर्मचाऱ्यांना सेवेत कायम न केल्यामुळे या संदर्भात अनेक दिवसांपासून कर्मचारी मागणी करीत आहेत. याबाबत मंत्री राधाकृष्ण विखे पाटील हे देखील शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवून कर्मचाऱ्यांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने प्रयत्न करीत आहेत. यापूर्वी सुद्धा 1052 कर्मचाऱ्यांना अशाच पद्धतीने पाठपुरावा करून सेवेत कायम करून घेण्याचा निर्णय झाला होता.
उर्वरित 598 कर्मचाऱ्यांच्या बाबतीत सुध्दा आता सकारात्मक विचार होण्याच्या दृष्टीने विखे पाटील यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी मंत्रालयात विधी न्याय विभागाचे प्रधान सचिव कलौटी, शिर्डी संस्थाने उपमुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांच्या उपस्थितीत बैठक घेऊन संस्थान कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्यांबाबत विधी व न्याय विभाग तसेच संस्थान स्तरावर कालबध्द कार्यवाही करण्याबाबत शिक्कामोर्तब करण्यात आले असल्याचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
या सर्व कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याबाबत सेवाप्रवेश नियमांसह सुधारित आकृतीबंध निश्चित करणे, कर्मचाऱ्यांची सेवाजेष्ठता निश्चित करणे तसेच कंत्राटी कर्मचाऱ्यांना कायम सेवेप्रमाणे लाभ मिळावेत, याबाबत विधी व न्याय विभाग आणि संस्थानच्या पुढाकाराने कार्यवाही करून लवकरच कर्मचाऱ्यांना दिलासा मिळवून देऊ, अशी ग्वाही मंत्री विखे पाटील यांनी दिली.