मुंबई – शिवसेना नेते संजय राऊत यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याशी भेट घेतली. त्यापाठोपाठ राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट शरद पवार यांनी घेतली. त्यावेळी मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे उपस्थित होते.
त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांनी केलेले आरोप त्याला नवाब मलिकांनी दिलेले उत्तर यानंतर घडलेल्या घटना आणि आर्यन खान प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर या राजकीय गाठीभेटींना महत्त्व प्राप्त झाले.
शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी शरद पवार यांची सकाळी भेट घेतली. त्यावेळी दोन्ही नेत्यांत बंद दाराआड चर्चा झाली. त्यानंतर पवार यांच्या उपस्थितीत वळसे पाटील यांच्या शासकीय निवासस्थानी महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीस मुंबईचे पोलीस आयुक्त हेमंत नगराळे हे उपस्थित होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात त्याबाबत अनेक अंदाज वर्तवण्यात येत आहेत.
एनसीबीकडून सुरू असणारी कारवाई आणि त्यात सापडलेली माहिती तसेच यात खंडणी उकळण्याचा झालेला प्रयत्न, त्याचा मुंबई पोलिसांकडून सुरू असणारा तपास याबाबत माहिती घेण्यात आल्याची चर्चा राजकीय वर्तुळात व्यक्त होत आहे. एनसीबीला हाताशी धरून खंडणी गोळा करणारे रॅकेट चालवले जात असल्याचा आरोप होत आहे. त्या पार्श्वभूमीवरही ही चर्चा झाल्याचे मानण्यात येत आहे.
दरम्यान, फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेआधी ही चर्चा झाली. फडणवीस यांची पत्रकार परिषद संपताच नवाब मलिक यांनी ट्विट केले. त्यात त्यांनी मी येत आहे, असे म्हटले होते. त्यानंतर पत्रकार परिषदेत त्यांनी फडणवीस यांचे अंडरवर्ल्डशी संबंध आहेत.
त्याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्री असताना शहराला वेठीस धरण्याचा प्रयत्न केला होता, असे आरोप केले. त्याची माहिती ते उद्या देणार असल्याचे जाहीर केले. त्याचा संबंध काही राजकीय निरीक्षकांकडून या बैठकीशी जोडला जात आहे.