नदीकाठ विकसन प्रकल्पाचे राजकारण तापणार
पुणे – मुळा-मुठा नदीकाठ विकसन प्रकल्पाबाबत मुंबईत बैठक झाली. हा विषय पुणे शहराशी संबंधित होता. त्यामुळे पुण्याचे प्रथम नागरिक या नात्याने महापौरांना बोलवणे अपेक्षित होते. पण, तसे कोणतेही निमंत्रण दिलेच नव्हते, असा आरोप महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केला आहे.
या प्रकल्पासाठी सर्व मान्यता राज्यशासनाकडून घेण्यात आल्या आहेत. त्याची विशेष कंपनी शासनाच्या संमतीनेच नेमण्यात आली आहे. प्रत्येक प्रस्तावास राष्ट्रवादीसह सर्वपक्षीय नगरसेवकांनी एकमताने मान्यता दिली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही प्रकल्पाचे सादरीकरण पाहिले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रकल्पाचे भूमिपूजन केल्यानंतर त्यावर आक्षेप घेत त्याचे काम थांबवणे म्हणजे राजकारण केले जात आहे, असा आरोप महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केला आहे.
भूमिपूजन कार्यक्रमाच्या एक दिवस आधी पुण्यात आलेल्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी नदीकाठ विकसन प्रकल्पावरच आक्षेप घेतला होता. त्यानंतर शनिवारी जलसंपदामंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक बोलविण्यात आली. त्यात या प्रकल्पासाठी एक समिती नेमली आहे. तसेच समितीचा अहवाल येईपर्यंत या कामास स्थगिती देण्याच्या सूचना महापालिका आयुक्तांना केल्या आहेत. त्यावरून आता शहरातील राजकारण तापण्याची चिन्हे आहेत.
प्रकल्पांसाठीच्या सर्व मान्यता तसेच सर्व अभ्यास करण्यात आला आहे. शासन आणि महापालिकेतही राष्ट्रवादीच्या सदस्यांनी त्यास मान्यता दिली आहे. आता काम सुरू झाल्यानंतर शंका उपस्थित करणे म्हणजे चुकीची प्रथा पाडली जात आहे. याबाबत शंका असतील तर दूर करता येतील. मात्र, काम थांबविणे हे सरळसरळ राजकारण आहे. शहरासाठी हा महत्त्वाचा प्रकल्प असून असा तो बंद करणे पूर्णत: चुकीचे आहे.
– मुरलीधर मोहोळ, महापौर.
पाच वर्षे हा प्रकल्प भाजपला सुचला नाही. हा प्रकल्प केवळ निवडणुका येताच दिसला. हा प्रकल्प करताना शहराला पुराचा धोका निर्मण होऊ शकतो. त्यामुळे स्वयंसेवी संस्थांनी त्यावर आक्षेप घेतला. त्यामुळे हे योग्य वाटल्यानेच जलसंपदा विभागाने काम थांबवले आहे. ऐन निवडणुकांच्या तोंडावर हा प्रकल्प आणण्यात आला होता. त्यामुळे या प्रकल्पास केवळ शहराच्या विकासाला विरोध नको म्हणून राष्ट्रवादीने नाईलाजस्तव पाठिंबा दिला होता.
– प्रशांत जगताप, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी कॉंग्रेस