प्रा. विजया पंडित
आपल्याला सर्वांना झोपेत स्वप्ने पडतात. यातील काही स्वप्ने आपल्या लक्षात राहतात तर काही स्वप्ने विस्मृतीत जातात. स्वप्न कोणते पडावे, यावर आपले नियंत्रण नसते असे आतापर्यंत मानले जाई. तथापि नव्या संशोधनातून असे समोर आले आहे की, स्वप्नांवर नियंत्रण ठेवणे शक्य आहे. म्हणजेच, आपण आपली मनपसंत स्वप्ने पाहू शकतो.
जर तुम्हाला नेहमी स्वप्ने पडत असतील तर तुम्ही सुपीक डोक्याचे आहात. होय, हा चेष्टेचा भाग नाही तर नव्याने झालेले संशोधन हेच सांगते. शास्त्रज्ञ असे सांगतात, की झोपताना आपला मेंदू अधिक सक्रियतेने काम करतो याचे लक्षण म्हणजेच स्वप्ने होत. शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, एखादी नवीन गोष्ट शिकल्यानंतर डुलकी घेणे चांगले असते. कारण शिकलेली नवी गोष्ट दीर्घकाळ स्मरणात राहण्यासाठी ही डुलकी आपल्याला मदत करते. जे लोक नवीन काम पूर्ण करण्याच्या बाबतीत स्वप्न पाहतात त्यांची कामगिरी असे स्वप्न न पाहणाऱ्यांच्या तुलनेत चांगली असते, असे शास्त्रज्ञांना आढळून आले आहे. शास्त्रज्ञांनी या बाबतीत रीतसर संशोधन केले आहे. त्यांनी लोकांना थ्री-डी कॉम्प्युटर कोड्याचा ले-आउट शिकण्यास सांगितले, जेणेकरून अनेक तासांनंतर या लोकांना व्हर्च्युअल स्पेसमध्ये कोड्याचे उत्तर मिळू शकेल.
हार्वर्ड मेडिकल स्कूलचे डॉ. रॉबर्ट स्टिकगोल्ड यांच्या मते, या लोकांना डुलकी घेण्यास सांगण्यात आले. ज्या लोकांना स्वप्नातही काम आठवले त्यांची शिकण्याची क्षमता असे स्वप्न न पडलेल्या लोकांच्या तुलनेत अधिक होती. संशोधकांच्या टीमच्या मते, जेव्हा आपण स्वप्न पाहतो तेव्हा अचेतन मेंदू माहितीचे उत्तर शोधण्यासाठी कठोर मेहनत करतो. या शोधनिबंधाचे लेखक डॉ. रॉबर्ट स्टिकगोल्ड म्हणतात, समस्येची सोडवणूक करण्यासाठी मेंदू अनेक पातळ्यांवर काम करतो आहे, याचा स्वप्न हा एक पुरावा असतो. ते म्हणतात, एखादी गोष्ट लक्षात ठेवण्यासाठीही मेंदू प्रयत्नरत आहे, हेही स्वप्नावरून दिसून येते. या आठवणी भविष्यासाठी खूपच उपयुक्त ठरू शकतात.
शोधनिबंधाच्या सहलेखिका डॉ. इरिन वॅंस्ले यांचाही असा निष्कर्ष आहे की, अचेतन मेंदू अशा गोष्टींच्या बाबतीत सर्वाधिक सक्रिय असतो, ज्या गोष्टींना तो सर्वोच्च प्राधान्य देतो. सर्व अन्य संशोधकांचे असे म्हणणे आहे की, ऍकेडमिक जर्नल सेल बायोलॉजी या नियतकालिकात प्रकाशित झालेल्या या संशोधनाचे निष्कर्ष व्यावहारिक आहेत. शास्त्रज्ञांच्या मते, या निष्कर्षांचा वापर करून विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची आणि लक्षात ठेवण्याची क्षमता वाढविता येऊ शकेल.
अर्थात, स्वप्ने हा नेहमीच माणसाचे लक्ष वेधून घेणारा विषय राहिला आहे. मानवी समाजाला स्वप्नांनी नेहमीच रोमांचित केले आहे. आपल्याला अखेर स्वप्ने का पडतात, ही जिज्ञासा प्रत्येक काळातील माणसाला वाटली होतीच. अर्थात, या प्रश्नाचे अंतिम उत्तर आताही मिळाले आहे असे नाही. सोळाव्या शतकापासून आतापर्यंत या बाबतीत अनेक मिथके प्रचलित आहेत. कोणी असे म्हणतात की, स्वप्नांचे वास्तवाशी काहीही देणेघेणे असत नाही. काहीजण म्हणतात, की स्वप्ने ही आपल्या अनुभवांचीच एक झलक असते आणि त्यावर आपले अजिबात नियंत्रण असत नाही. परंतु आता शास्त्रज्ञांनी मेंदूच्या संचालनाचा बऱ्याच अंशी शोध घेतला आहे आणि काही विशिष्ट मर्यादेपर्यंत मेंदूतील हालचालींवर नियंत्रणही प्राप्त केले आहे. त्यामुळे असाही दावा करण्यात येत आहे की, आता आपण आपल्याला हवे ते स्वप्न पाहू शकू.
शास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार, झोपेचे काही टप्पे असतात. या टप्प्यांनाच सावध झोप आणि गाढ झोप असे म्हटले जाते. गाढ झोपेत मेंदू इतका शांत झालेला असतो की तो स्वप्न पाहू शकत नाही. सावध झोपेत अनेक हालचाली होत असतात. या काळात डोळ्यांच्या बाहुल्यांचीही हालचाल होत असते. या हालचालीला रॅपिड आय मूव्हमेंट म्हणजेच आरईएम म्हणतात. ही मनाची अचेतन अवस्था आहे. शास्त्रज्ञांना असे आढळून आले आहे की सावध झोप आणि जाग यांच्यादरम्यान एक अवस्था असते. त्यात चांगली स्वप्ने पडतात. या अवस्थेला चेतना आणि चेतनाशून्यता याच्यामधील अवस्था मानले जाते. ही स्थिती अशी असते, जेव्हा व्यक्तीला आपण स्वप्न पाहात आहोत, हे माहीत असते आणि जर त्याने मनात आणले तर तो त्या स्वप्नावर नियंत्रणही मिळवू शकतो. किंवा असेही म्हणता येईल, की व्यक्तीला स्वप्नाचा शेवट आपल्याला वाटेल त्या मार्गाने वळविता येतो.
विजेच्या नाजूक आणि नियंत्रित झटक्यांच्या माध्यमातून शास्त्रज्ञांनी या संशोधनात सामील झालेल्या स्वयंसेवकांना असे वाटण्यास भाग पाडले, की ते स्वप्न एक त्रयस्थ आणि तटस्थ व्यक्ती म्हणून पाहू शकत आहेत आणि आपल्या इच्छेनुसार त्या स्वप्नाला दिशा देऊ शकत आहेत. या संशोधनाचा फायदा लवकरच मानसिक आजारांवरील उपचारांसाठी होऊ शकेल, अशी आशा आहे. त्याचप्रमाणे जे लोक मानसिक धक्क्यातून जात आहेत किंवा वाईट स्वप्नांनी हैराण झाले आहेत, त्यांनाही या संशोधनाचा लाभ होऊ शकेल. या संशोधनाचे नेतृत्व करणाऱ्या उर्सुला फॉस यांचे म्हणणे असे आहे की, टीएसीएस तंत्रज्ञानावर आधारित एक यंत्र बाजारात येईल आणि लोक आपल्या मनाच्या इच्छेनुसार स्वप्न पाहू शकतील, तो दिवस आता फार दूर नाही.