नवी दिल्ली: चीन सीमेवर झालेल्या संघर्षाबाबत केंद्र सरकारने सर्वपक्षीय बैठक बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या शुक्रवारी सायंकाळी पाच वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरसिंगद्वारे ही बैठक होईल.
चीनशी निर्माण झालेल्या तणावाबाबत विरोधकांनाही विश्वासात घेण्याचा प्रयत्न म्हणून या बैठकीकडे पहात आहे. मोदी सरकारने प्रथमच चालू संघर्षाबाबत ही बैठक बोलावली आहे.
चीन बरोबरच्या संघर्षाच्या स्थितीबाबत सरकारकडून काहींच माहिती दिली जात नसल्याची टीका कॉंग्रेससह अन्य विरोधी पक्षांनी सातत्याने केली आहे. चीनने भारतीय भूमिचा बराच भाग बळकावला असल्याचे सतत सांगितले जात आहे, त्याविषयीही सरकारने कोणतेही भाष्य न केल्यानेही सरकारवर टीका केली जात होती.
काल थेट पूर्व लडाखमधील गलवान खोऱ्यात भारत-चीन यांच्यातील लष्करात मोठा संघर्ष झाला. त्यात भारतीय बाजूचे 20 जवान शहीद झाल्यानंतरही मोदी अजून गप्प का आहेत, असा सवाल विरोधकांनी उपस्थित केला होता. या पार्श्वभूमीवर सरकारने आज घेतलेला निर्णय महत्त्वपूर्ण ठरला आहे.