आळंदी -आळंदी शहराला भामा-आसखेड प्रकल्पातून पाइपलाइनद्वारे होणारा पाणीपुरवठा खंडित झाला आहे त्यामुळे नागरिकांना आता टॅंकरने पाणी विकत घ्यावे लागत आहे. संपूर्ण शहरातून मागणी वाढल्याने टॅंकरचे दर दुप्पट झाले आहेत. पूर्वी सहा हजार लिटर पाणी असलेले टॅंकर 300 ते 400 रुपयांना मिळत असे ते आता 600 ते 700 रुपयांना मिळत आहेत.
शहराला भामा-आसखेड प्रकल्पातून पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठा सुरू झाला तेव्हापासून पाइपलाइन लिकेज, पाइपलाइन फुटणे, विद्युतपुरवठा खंडित होणे अशा तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे पाणी माफीया देखील याचा फायदा घेत असल्याने पाण्याचे दर आकाशाला भिडले आहेत.
एक-दीड महिना आळंदीकरांना पिण्याच्या पाण्याबद्दल सुगीचे दिवस आले होते; परंतु अल्पावधीतच भामा आसखेड प्रकल्पाची वारंवार तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्याने पुन्हा आळंदीकरांना विकतचे पाणी घ्यावी लागत आहे, त्यामुळे नागरिकांमध्ये देखील असंतोषाचे वातावरण असून आळंदी नगरपालिका प्रशासनावर आळंदीकर सध्या तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.