आळंदी – श्री संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळा आणि कार्तिकी वारी सोहळा यावर्षी 5 डिसेंबर ते 12 डिसेंबर दरम्यान पार पडला. याकाळात आळंदी ग्रामीण रुग्णालयाकडून 50 हजार 700 रुग्णांना मोफत उपचार देण्यात आहे. यात 82 अत्यवस्थ रुग्ण होते. महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने, आरोग्यमंत्री प्रा.डॉ.तानाजी सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदी कार्तिकी वारीत वारकऱ्यांसाठी मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या. आरोग्य तपासणी, आंतररुग्ण सेवा, उपचार, संदर्भ सेवा, रुग्णवाहिका सेवा या सुविधांचा लाभ वारकऱ्यांनी घेतला, अशी माहिती आळंदी ग्रामीण रुग्णालयाकडून देण्यात आली.
आळंदी शहरातील आठ ठिकाणी वैद्यकीय पथके तैनात करण्यात आली होती. माऊली मंदिराजवळ ग्रामीण रुग्णालय असून तेथे 24 तास आरोग्य सेवा उपलब्ध होती. याशिवाय, पाच रुग्णवाहिकाही तैनात करण्यात आल्या होत्या. वारी काळात आरोग्य विभागाकडून प्रभाग निहाय प्रतिबंधात्मक सेवांसाठी बारा पथकेही तयार करण्यात आली होती. या पथकांतर्फे हॉटेल, टँकर भरणा केंद्र, नळ-विहिरी आणि बोर येथील पाणी तपासणी, धर्मशाळा तपासणी केली जात होती.
वारी काळात आरोग्य विभागाच्या माध्यमातून 50,700 रुग्णांना मोफत उपचार देण्यात आले. यामध्ये 82 अत्यवस्थ रुग्णांचा समावेश आहे. या सर्व रुग्णांवर यशस्वीरित्या उपचार करण्यात आले. वारकऱ्यांनी वारी काळात आरोग्याची काळजी घेण्यासाठी आरोग्य विभागाकडून उपलब्ध करून दिलेल्या सुविधांचा लाभ घ्यावा, असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात आले होते. आळंदी कार्तिकी वारीत आरोग्य विभागाने वारकऱ्यांसाठी उत्तम सेवा केली. यामुळे वारकऱ्यांना कोणत्याही आरोग्य समस्या उद्भवल्या नाहीत.
या आरोग्य सेवेच्या कार्यात उत्कृष्ट सेवा देण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा शल्य चिकित्सक, वैद्यकीय अधिक्षक, तालुका आरोग्य अधिकारी तसेच सर्व डॉक्टर्स, नर्सेस, आशा ताई, सर्व आरोग्य कर्मचारी, स्वयंसेवक यांचे आरोग्य सेवा पुणे परिमंडळाचे उपसंचालक डाॅ. आर.बी. पवार यांनी कौतुक केले. या शिबिरामुळे वारकऱ्यांचे आरोग्य चांगले राहण्यास मदत झाली आणि त्यांना आळंदीच्या वारीचा आनंद घेता आला, असेही पवार म्हणाले. आळंदी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डाॅ. नंदू वणवे, तालुका आरोग्य अधिकारी डाॅ. पारखे यांनी वारी काळात भाविकांना आरोग्य सेवा पुरविण्यासाठी नियोजन केले होते.