मराठीतील पहिले ज्ञानपीठ पुरस्कार विजेते, ख्यातनाम लेखक, जीवनभाष्यकार वि. स. खांडेकर यांची “अमृतवेल’ एक अत्यंत गाजलेली कादंबरी होय. दीडशे पृष्ठसंख्या असणारी ही कादंबरी पहिल्या पानापासूनच वाचकांच्या अंतर्मनाचा ठाव घेते. मानवी जीवनातील गुंतागुंतीचे कंगोरे व त्यावर अत्यंत समृद्ध भाषाशैलीतून केलेले चिंतन-मंथन आणि परिपक्व भाष्य कादंबरीची श्रीमंती अधोरेखित करते.
नंदा खरे तर अलकनंदा ही या कादंबरीची नायिका आहे. कलाशाखेत शिक्षण घेतलेली साहित्याचा उत्तम अभ्यास असणारी, तरतमभाव बाळगणारी, नीरक्षीरविवेक ठेवणारी देखणी तरुणी म्हणजे नंदा! नंदाच्या घरी आई-वडील आणि भाचा मिलिंद हे अजून तीन सदस्य. काही दुर्दैवी घटना गेल्या काही महिन्यांत या कुटुंबाला बघाव्या लागल्या आहेत. नंदाचे वडील दादा तत्त्वज्ञानाचे उत्तम प्राध्यापक. जीवनभर विशिष्ट तत्त्वाने त्यांनी वाटचाल केलेली. बेचाळीसच्या स्वातंत्र्यलढ्यात दादांची नोकरी गेली. त्यांना दोन मुली. मोठी सुमित्रा आणि धाकटी नंदा. सुमित्राचे पती डॉक्टर होते. मिलिंदच्या जन्मानंतर दुर्दैवाचा घाला नंदाच्या कुटुंबावर आला. सुमित्राचा अत्यंत अकाली मृत्यू झाला. मिलिंद पोरका झाला. डॉक्टरांनी दुसरे लग्न केले. सावत्र आईने मिलिंदचा सांभाळ करण्यास नकार दिला. त्यामुळे मिलिंद आजोळीच आला. लहानगा मिलिंद मावशीच्या म्हणजे नंदाच्या कमालीचा अंगावरचा होता. नंदा त्याचे अत्यंत मार्दवाने करीत असलेले संगोपन “माय मरो नी मावशी जगो’ या उक्तीला सार्थत्व देणारे होते. पण दुर्दैव इथेच संपले नव्हते. नंदा शेखर या तडफदार वैमानिकाच्या प्रेमात पडली. कला शाखेत रमणारी ही युवती वैमानिकाच्या प्रेमात पडणे दादांसाठी आश्चर्यकारकच होते. अर्थात शेखर कोणालाही पसंत पडावा असाच होता. प्रेम फुलत असताना नी लग्न लवकरच व्हावयाचे असताना एके दिवशी विमान अपघातात शेखरचाही मृत्यू होतो आणि नंदा कोसळते. कोलमडते, सैरभैर होते.
कादंबरीचा प्रारंभ नंदा घराबाहेर गेलेली आहे आणि तिला वेळ झाल्याने तिच्या मातोश्री चिंतेत आहे, या प्रसंगाने होतो. मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असणाऱ्या नंदाला झालेला उशीर माईंसाठी कमालीचा अस्वस्थ करणारा आहे. कारण बाहेर जाऊन नंदा आपल्या जीवाचे काही बरेवाईट तर करणार नाही ना हा विचार त्यांच्या मातृहृदयाला सारखा कुरतडतो आहे.
शेक्सपिअर, इब्सेन, चेकॉव्ह, बर्नार्ड शॉ हे पाश्चात्य नाटककार नंदाला कमालीचे आवडत. त्यांच्यासोबतच भवभूतीचे उत्तररामचरित किंवा इतरही मराठी आणि संस्कृतमधील दर्जेदार लेखक तिच्या खोलीत ग्रंथरूपाने विराजमान होते. त्यामुळे अशी बुद्धिमान मुलगी आत्मघातासारखा लांच्छनास्पद प्रकार कधीही करणार नाही याची दादांना खात्री होती.
अखेर उशिराने नंदा आली, पण त्यावेळी दादा काहीसे तिच्यावर नाराज झालेले होते. त्या रात्री नंदाने दादांना एक भावस्पर्शी पत्र लिहिले. त्यात ती उद्विग्न अवस्थेत दूरदूरपर्यंत भरकटत होती, आत्महत्येचे विचार तिच्या मनात घोळत होते पण त्यापासून तिने स्वत:ला परावृत्त केले आणि उद्या ती तिचे अत्यंत आवडते प्राध्यापक दासबाबू यांच्याकडे पीएच.डी.करण्याच्या दृष्टीने चौकशी करायला जाणार असल्याचे लिहिले होते. ते पत्र दादांच्या हाती नंदा नसताना पडते आणि दादाही तिला धीर देणारे पत्र लिहून पीएच.डी.साठी परवानगी देतात.
नंदाची आई माई एक सोशिक स्त्री. स्वातंत्र्यलढ्याच्या काळात दादांनी स्वातंत्र्यसैनिकांना दिलेला आश्रय, नोकरी गेलेली, परिस्थिती अगदीच बेताची, पुढे मुलगी आणि होणाऱ्या जावयांचे धक्कादायी मृत्यू या साऱ्याने माई पिचून गेल्या होत्या. नातू मिलिंदमुळे त्यांनी उभारी धरलेली होती.
नंदाचे इंग्रजीचे प्राध्यापक नलिनीरंजन दास यांच्याकडे दादा आणि नंदा जातात, त्यावेळी दासबाबू एकट्यानेच बुद्धीबळ खेळत असतात. ते नंदावर कमालीचे प्रेम करीत असतात. जणू आपली मुलगी म्हणूनच ते नंदाला मानतात. नंदा आणि दादांना पाहून त्यांना खूप आनंद होतो. तिघांच्याही इंग्लिश साहित्यावर गप्पा रंगतात. शेक्सपिअरच्या “हॅम्लेट’वर तिघांची चर्चा रंगते. त्यावेळी दासबाबू आणि नंदाच्या भाष्याने दादा कमालीचे भारावतात. पीएच.डी.ऐवजी दासबाबूंकडे नंदासाठी एक वेगळीच संधी हात जोडून उभी असते.
नंदाची वर्गमैत्रिण वसुंधरा गुप्ते हिला एका कंपॅनिअनची गरज असते. वसुंधरा कॉलेजमध्ये खूप सुंदर गाणारी गायिका म्हणून ओळखली जात असते. “ओ सजना बरखा बहार आयी’ हे त्याकाळचं लोकप्रिय गाणं ती अगदी लतादीदींच्या शैलीने गात असते. देखणी वसुंधरा सौंदर्यामुळे आणि तिच्या आवाजामुळे देवदत्त इनामदारांना पसंत पडते. देवदत्त विलासपूरचे इनामदार असतात. वसुला सध्या एकाकी वाटत असते आणि तिची पाच वर्षांची मुलगी मधुरा हिला अधूनमधून फिटस् येत असतात. त्यामुळे तिला एखादी विश्वासू जोडीदारीन हवी असते. दासबाबू नंदापुढे हा प्रस्ताव ठेवतात आणि माई-दादांना वसू भेटल्यावर नंदाला जाण्याची परवानगी मिळते.
नंदाला शेखरच्या मृत्यूनंतरच्या धक्क्यातून बाहेर पडण्यासाठी ही एक संधीच असते. वसूबरोबर तिच्या गाडीतून विलासपूरला ती जायला निघते. नंदा ही आपली नवी मावशी आहे, हे मधुराने एव्हाना मान्य केलेले असते. मुळात नंदा ही एक अत्यंत आपुलकीने वागणारी, ममत्व जिच्या रोमारोमात वसले आहे अशी कनवाळू स्वभावाची असल्याने मधुराला तिचा अल्पावधीत लळा लागतो. विलासपूरचे इनामदार अत्यंत श्रीमंत असतात. तिथे पोहचल्यावर त्यांच्या वैभवाची कल्पना नंदाला येते. अर्थात अशा श्रीमंतीने भारावून जाण्याचा उथळपणा नंदामध्ये नसतोच. वसूच्या घरी तिचे पती देवदत्त आणि नोकरचाकर असतात. तिचे सासरे नवऱ्याच्या लहानपणीच वारले आहेत आणि सासूबाई तीर्थयात्रेला गेल्या आहेत हे वसूच्या बोलण्यातून नंदाला कळते.
वसूच्या बंगल्यासमोरच्या बागेपलीकडे असणाऱ्या तीनचार बंगल्यात देवदत्त राहत असतात. देवदत्त व वसूमध्ये फारसे चांगले संबंध नाहीत हे लवकरच नंदाला कळून चुकते. सहज म्हणून ती समोरच्या बंगल्यात जाते तेव्हा देवदत्तांची एक शेकडो ग्रंथांनी भरलेली लायब्ररी आहे हे तिला दिसते. ते पाहिल्यावर ती हरकते. त्या दिवाणखाण्यात काही उत्तमोत्तम चित्रे, एका कोपऱ्यात सतार, बंदुकी ठेवलेल्या असतात. देवदत्तांनाही शेक्सपिअरचे साहित्य आणि भवभूतीचे “उत्तररामचरित’ आवडत असल्याची खूण तेथील टेबलवर पडलेल्या ग्रंथांवरून पटते. आपलीही आवड हीच असल्याने तिला त्याचे आश्चर्य वाटते.
काही दिवसांनंतर अगदी अचानक तिची देवदत्तांशी भेट होते. त्यांच्या बोलण्यावरून ते अत्यंत रसिक, अभ्यासू, दुसऱ्याचा विचार करणारे वाटतात. तरीही वसूशी त्यांचे का पटत नाही हा मोठा प्रश्न त्यामुळे तिला पडतो. नंदाचे देवदत्तांशी बोलणे वसूला अजिबात आवडत नाही. हळूहळू त्यांच्या भेटी वाढतात आणि नंदा देवदत्तांच्या प्रेमातच पडते. पण हे प्रेम वासनामयी नसून शुद्ध अंत:करणाने केलेली प्रीती असते. मधुराच्या मनात देवदत्तांविषयी असणारी भीती नंदा हळूहळू दूर करते.
एक दिवस देवदत्तांच्या आग्रहावरून ती देवदत्तांच्या गाडीतून चंदनगडला जाते. तिथे त्यांची बंगली असते. देवदत्तांसोबत तिचे जाणे वसूच्या क्रोधाला ओढवून घेण्याला कारण ठरते. चंदनगडला देवदत्त “आपल्या वडिलांना आईच्या चारित्र्यामुळे घर सोडून जावेसे वाटले’ हे सांगतात तेव्हा नंदाला धक्का बसतो. रात्री चंदनगडला नंदाला अपरिहार्यपणे राहावे लागते. कारण देवदत्तांना जंगलातल्या नरभक्षक वाघिणीला पकडण्यासाठी जावे लागते. परंतु यामुळे वसुंधरा प्रचंड संतापते आणि नंदाला आपल्या घरी परत जावयास सांगते. नंदा परतते पण काही दिवसांतच तिला वसूची तब्बेत बिघडल्यामुळे परत यावे लागते. नंदा परत आल्याने मधुराला कमालीचा आनंद होतो. वसूने घेतलेला संशय आणि देवदत्तच्या लाडक्या चंचल हरिणीला केलेला विषप्रयोग यामुळे देवदत्त क्रोधायमान होतात. नंदा आल्यावर काही दिवसांतच वसूची तब्बेत सुधारते. दरम्यान, देवदत्तांनी नंदासाठी एक पत्र ठेवलेले असते. ते पत्र वाचल्यावर देवदत्तांच्या आईचे ते पत्र आहे हे नंदाला लक्षात येते. आईने केलेल्या गुन्ह्यांची कबुली त्या पत्रात असते परंतु त्यापाठीमागचे स्पष्टीकरणही आईने दिलेले असते. नंदा या सर्व प्रकाराचा सारासार विचार करते.
अखेरीस नंदा देवदत्ताच्या बंगलीत मधुराला घेऊन जाते. तेथे बाप-लेकीची भेट घडवून आणते. देवदत्त आणि तिचे बराचवेळ संभाषण होते. त्यानंतरच्या दिवशी देवदत्ताच्या बंगलीतून सतारीचे बोल ऐकू येतात तेव्हा नंदा कमालीची खूश होते. देवदत्तांची मनःस्थिती उल्हासित झाल्याचे ते लक्षण असते. दुपारच्या वेळी एका नोकराच्या हाती नंदाला देवदत्तांचे पत्र प्राप्त होते. त्या पत्रात आपण भ्रमंतीसाठी बाहेर पडल्याचे आणि परत केव्हा येऊ याची खात्री नसल्याचे देवदत्तांनी लिहिलेले असते. या भ्रमंतीत आईचा शोधही ते घेणार असतात. देवदत्तांचे पत्र पाहून नंदाला समाधान वाटते आणि ती गुणगुणू लागते, “मोगरा फुलला… मोगरा फुलला.’ याठिकाणी कादंबरी संपते. एका प्रगल्भ नायिकेची विलक्षण कहाणी वि. स. खांडेकरांनी “अमृतवेल’मध्ये रेखाटली आहे. खरे तर ही नायिका अलकनंदा अर्थात नंदाच “अमृतवेल’ आहे, हे पटल्याशिवाय राहत नाही.
पुस्तकातील माणसं
– डॉ. विनोद गोरवाडकर